Wednesday 21 December 2011

भीतीच्या सावटाखालील पाकिस्तान!

मूळ लेखिका: हुमा यूसुफ अनुवाद: सुधीर काळे (sbkay@hotmail.com)
'नाटो'ने पाकिस्तानी ठाण्यावर अलिकडेच केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर (ज्यात २४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले) पाकिस्तानी जनतेत मोठाच गदारोळ उठला. राजकीय नेते मंडळी, दूरचित्रवाणीवर राजकीय घटनांवर आधारित चर्चा-कार्यक्रम सादर करणारे सूत्रधार, सर्वसामान्य लोक या सार्‍यांचेच आवाज कर्कश, उर्मट, मगरूर होत गेले.
सार्‍या जगाला पाकिस्तानी जनतेचा सामुदायिक संतप्त आकांत ऐकायला मिळाला. डझनभर खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या, ट्विटर आणि फेसबुकवरील पोस्ट्स, एकमेकांना सेलफोनवर पाठविलेले मजकूर या सर्वांमुळे हा आकांत आणखीच मोठ्या आवाजात ऐकू येऊ लागला. पण नीट लक्ष दिल्यास जाणवत होते की पाकिस्तानी लोकांच्या 'शांततेचा आवाज'च जास्त मोठा आणि कानठळ्या बसविणारा होता. जसजशी पाकिस्तानातील देशांतर्गत आणि भोवतालची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि धोकादायक होत आहे, तसतशी ज्या गोष्टींची वाच्यता करायची नाही अशा गोष्टींची यादीही लांब होत आहे.
जेव्हा कुणी चित्रवाणीवरील कार्यक्रमांची झर-झर पाहणी करत असतो (browsing) किंवा इंटरनेटवर असतो तेव्हा या गोष्टीची त्याला जाणीव होत नाही. पण सेन्सॉरशिपचे पुनरागमन चांगलेच जोरात होत आहे हे उघड दिसत आहे. तेही केवळ एक राजकीय खेळी म्हणून नव्हे तर सेन्सॉरशिप हळू-हळू पाकिस्तानी जनतेच्या जीवनातील रोजची गोष्ट केली जाऊ लागली आहे.पाकिस्तानच्या अखिल पाकिस्तान केबल ऑपरेटर्स असोसिएशनने (APCOA) परदेशी वृत्तवाहिन्या पाकिस्तानमध्ये दाखविणे बंद करण्याचा निर्णय घेतला, कारण त्या वाहिन्या पाकविरोधी घटना दाखवीत होत्या. पाकिस्तानी लोकांनी काहीही वाईट पाहू नये, त्यांच्या कानांवर काहीही वाईट पडू नये या 'उदात्त' हेतूने त्यांच्या नागरी हक्कांवर केलेल्या अतिक्रमणातील ही अगदी अलीकडची फसवी चाल होती. एरवी एका वेगळ्या वातावरणात वॉशिंग्टनच्या बड्या धेंडांकडून मिळालेल्या माहितीवरून विश्वसनीय पत्रकारितेच्या रूपाने मिळालेली आणि अलीकडेच "बीबीसी"वर दाखविलेल्या 'Secret Pakistan' या माहितीपटात दाखविण्यात आलेली पाकिस्तानी दुटप्पीपणाबद्दलची बोचरी माहिती पाहून, पाकिस्तानी लोकांना हायसे वाटले असते. कारण मग पाकिस्तानी लोकांनी 'बीबीसी'वर दाखविलेल्या माहितीचा उपयोग आपल्या देशाच्या अशा अडचणीत आणणार्‍या परराष्ट्र धोरणातील चुकांच्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर तर्कसंगत चर्चा करता आली असती. पण आपल्या डावपेचांच्या योग्यायोग्यतेबद्दल चर्चा करून त्यांना नीट पारखून, त्यात योग्य ती दुरुस्ती करण्याऐवजी आपण त्या वाहिनीवरच बंदी घातली आणि इराणचे अनुकरण करत स्वत:लाच फसवणार्‍या अलिप्ततावादाकडे आपली पावले वळविली!
पण पाकिस्तानच्या जोशपूर्ण मानल्या जाणार्‍या प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिपचा सार्वत्रिक प्रसार होत असलेला पाहणार्‍या पाकिस्तानी जनतेला 'बीबीसी'वर घातलेल्या बंदीचे आश्चर्य वाटायला नको. या तर्‍हेच्या बंदीची सुरुवात बलुचिस्तानच्या संकेतस्थळांवर आणलेल्या बंदीने झाली. त्यानंतर फेसबुकवरही बंदी घातली गेली कारण तिथे कुणी एका सभासदाने प्रेषक महंमद यांची प्रतिमा चितारण्याचे आवाहन केले होते.
असे आवाहन मुस्लिम धर्माची निंदा करणारे आणि त्यांच्या भावना दुखावणारे असलेल्यामुळे त्यावेळी सार्वजनिक क्षेत्रांत घालण्यात आलेल्या या बंदीविरुद्ध कुणी आवाज उठविला नव्हता. पण एक वर्षानंतर जेव्हा पेम्राने (Pakistan Electronic Media Regularity Authority) दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांना जेव्हा (तथाकथित) ’माननीय’ नेत्यांचे चारित्र्यहनन करणार्‍या उपहासपूर्ण कार्यक्रमांविरुद्ध ताकीद दिली, तेव्हा मात्र जनतेच्या चेहर्‍यांवर प्रश्नचिन्हे नक्कीच उमटली. अलीकडेच पाकिस्तानच्या Telecommunications Authority ने जवळ-जवळ १००० तथाकथित अश्लील शब्दांचा SMS मध्ये वापर करण्यावर बंदी आणली, तेव्हा या बंदीची मात्र सर्वत्र टिंगल आणि हेटाळणीच करण्यात आली.
सरकारच्या सेन्सॉरशिपच्या अशा बावळट प्रयत्नांची पाकिस्तानी जनतेने टिंगल आणि हेटाळणी करून अशी बंदी हसण्यावारी नेली असली, तरी एकाद्या समाजाचा आवाज बंद करण्याच्या अशा कृती अशा हसण्यावारी घालविण्यासारख्या नक्कीच नाहीत. सत्य परिस्थिती अशी आहे, की या सेन्सॉरशिपमध्ये सरकारचे आगमन काहीसे उशिरा झालेले आहे. सरकार जरी अधिकृत यंत्रणा उभी करण्याच्या प्रयत्नांत असले, तरी प्रसारमाध्यमे सेन्सॉरशिपची बरीच बंधने स्वत: होऊन पाळत आहेत. अलिकडे पाकिस्तानच्या जनतेत स्वतःची अशी एक आगळी-वेगळी (अ)क्षमता दिसू लागली होती. ज्या साधनांचा उपयोग करून आणि आपसात चैतन्यमय संवाद साधून ट्युनिशिया, इजिप्त वगैरे देशांतील जनतेने "वसंतऋतू" निर्माण केला आणि हुकुमशाही झुगारून दिली. उलट पाकिस्तानमध्ये याच साधनांचा उपयोग मुस्कटदाबी आणि दडपशाही करण्यासाठी केला गेलेला आहे. ज्या खासगी चित्रवाहिन्यांनी आणि फेसबुकसारख्या सामाजिक संकेतस्थळांनी, नेटवर्क्सनी इतर देशांमध्ये जनतेच्या असंतोषाला "वसंतऋतू"च्या आगमनात हिरीरीने भाग घेतला, त्यांनीच पाकिस्तानात मात्र आपल्या प्रसारणकौशल्याचा वापर करून गुप्तपणे, अव्यक्तपणे हुकुमशाहीला मदतच केली.
उदाहरणार्थ "लाल" या संगीत-वाद्यवृंदाने तक्रार केली कीं खासगी चित्रवाहिन्यांनी त्यांच्या "झूठका उंचा सर" या चित्रफितीमधील गाण्याच्या प्रक्षेपणावर बंदी घातली. कारण त्यांना या गाण्यात लष्करविरोधी टोमणे दिसून आले. लष्कराच्या जनसंपर्क विभागाने या चित्रफितीला "काळ्या यादी"त घालायची सूचनाही केली नव्हती. तरीही पाकिस्तानच्या "स्वतंत्र" प्रसारमाध्यमांनी स्वेच्छेनेच या हुकुमशाहांच्या वतीने असे केले. हे तर एक किरकोळ उदाहरण आहे. दहशतवाद, नाहीशी झालेली (नाहींशी केली गेलेली) माणसे, संरक्षण मंत्रालयाचे अंदाजपत्रक, भ्रष्टाचार आणि बेलगाम सर्वव्यापी धार्मिक कट्टरतावाद, असले अवघड प्रश्न इथे कधीच विचारले जात नाहीत (आणि त्यामुळे) त्यांची उत्तरेही मिळत नाहीत.
अशा परिस्थितीत चित्रवाणीवरील कार्यक्रमांचे सादरकर्ते आणि संचालक आपली टिंगल/चेष्टामस्करी चालूच ठेवतात, ब्लॉग्जवर लिहिणारे लिहीत रहातात, ट्विटरचे सभासद ट्वीट करत रहातात पण मतभेदांशी किंवा असंतोषाशी भिडण्याऐवजी हे सारे सक्रीय सार्वजनिक कार्यक्रम या घटनांबद्दल गप्प राहणेच जास्त करून पसंत करतात. आपले म्हणणे ठासून मांडू इच्छिणारे पाकिस्तानी लोक आज जितके आहेत, तितके यापूर्वी कधीही नव्हते. पण अशा सामुदायिकपणे उमटलेल्या जनतेच्या आवाजांचा उपयोग एकाद्या गोष्टीची बहुविध यथार्थ चित्रे किंवा निरनिराळे विकल्प मांडण्यासाठी करण्याऐवजी जनतेचे हे आवाज न ऐकू येतील, असे करण्यातच होताना दिसतो. एकाद्या ब्लॉगवर लेखकाच्या मताविरुद्ध काही लिहिले रे लिहिले, की लगेच तुम्हाला CIA चा हिंदूंचा किंवा इस्राईलचा गुप्तहेर ठरवले जाते. (भारतातही कुणी हिंदूंच्या किंवा भाजपच्या बाजूने काहीही बोलले, की त्याला रा.स्व. संघाचा छुपा हस्तक म्हटले जातेच की!-सुधीर काळे).
मी पत्रकारांनी स्वतःहून पत्करलेली "स्व-सेन्सॉरशिप" आणि "स्वसरंक्षण" यांच्यात गल्लत करत आहे, असा कुणी माझ्यावर असा आरोपही करेल आणि सरकारच्या सक्त कारवाईमुळे एक तर्‍हेची सावधगिरीची, दक्षतेची संस्कृती पाकिस्तानी लोकांवर लादली जात आहे असा युक्तिवादही करेल. पण ज्या संस्कृतीत पत्रकारांना नियमितपणे धमक्या दिल्या जातात, त्यांचे हाल-हाल केले जातात, ज्यांना पळवून नेले जाते[१] इतकेच काय ज्यांचा खूनही केला जातो[२] त्या समाजाकडून मी चांगुलपणाची आणखी काय अपेक्षा करू शकते?
पण प्रमाणिकपणे पाहिल्यास आजमितीस सर्वात कडक आणि कट्टर सेन्सॉरशिप भोजनगृहे, कार्यालयातील कामाच्या जागा, स्वतःच्या मालकीच्या मोटारगाड्या यासारख्या पाकिस्तानच्या खासगी जीवनात लादली जात आहे. जस-जसा पाकिस्तानी समाज जास्त-जास्त कट्टरतावादी, धृवीकरण झालेला आणि अती नैतिकतेकडे झुकणारा (moralistic) समाज होत आहे तस-तसा हा समाज कुणी, कुठे आणि काय बोलावे याबाबत दक्षता घेऊ लागलेला आहे-मग ते मित्रांत, कुटुंबीयांत किंवा सहकार्‍यांत खासगीत बोललेले असो वा प्रकटपणे सार्वजनिक मंचावर बोललेले असो, मग ते लिखित असो अथवा नभोवाणीवरून बोललेले असो किंवा छापील असो!
जे लोक पंजाबचे माजी राज्यपाल सलमान तासीर यांच्या वधामुळे भयचकित झाले, पण त्यांचा खुनी मुमताज कादरीचा तावातावाने निषेध करत नाहींत[३], जे लोक अमेरिका-पाकिस्तान यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध असणे पाकिस्तानच्या हिताचे आहे, असे मानतात. पण टोकाच्या राष्ट्रप्रेमापायी आक्रमक, युद्धपिपासू परराष्ट्रधोरणाचा पुरस्कार करणार्‍यांच्या रोषाला घाबरून अमेरिकेची तशी तारीफ करू शकत नाहीत, जे इम्रान खान यांच्या अतिरेक्यांबद्दलच्या धोरणांना प्रमाणाबाहेर मवाळ समजतात, पण आपल्यावर बारीक-बारीक खुस्पटे काढणारा, शंकेखोर असल्याचा किंवा देशद्रोही असल्याचा आरोप होईल म्हणून गप्प बसतात, जे अहमदींना आपापल्या धर्मानुसार वागण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे अशा मताचे आहेत पण ईश्वरनिंदेच्या आरोपाखाली होणार्‍या निंदेच्या व शिक्षेच्या भीतीने कांहीच न बोलता गप्प बसतात, अशा लोकांना बीबीसीवरील बंदी म्हणजे पाकिस्तानच्या संस्कृतीचे तर्कसंगत प्रसरणच वाटते. त्यात काहीही चुकीचे वाटत नाहीं[४].
लोकशाहीचा मूलभूत निकष आणि आविष्कार तेव्हाच जाणवतो, जेव्हा जनतेला वाटते की आपल्याला आवाज आहे व आपले म्हणणे ऐकून घेतले जात आहे. जस-जशी जास्त-जास्त पाकिस्तानी लोकांची मुस्कटदाबी होईल, तस-तसे लोकशाहीचे आपले स्वप्न आपल्या हातातून निसटेल. झियांच्या कारकीर्दीत जितकी मुस्कटदाबी होती त्याहून जास्त प्रतिगामी मुस्कटदाबी आता पाहायला मिळत आहे. झियांच्या कारकीर्दीत "वरून खाली" लादलेल्या सेन्सॉरशिपचा परिणाम वृत्तपत्रांना दिलेल्या "सल्ल्या"त, ताकिदींमध्ये किंवा सार्वजनिकपणे मारलेल्या फटक्यांत होत असे. पण "खालून वर" येणार्‍या निषेधांच्या किंवा परिसंवादांच्या संस्कृतीचा परिणाम असे खासगीत व्यक्त केलेले निषेधांचे सूर एकजीव होऊन त्यातून जनजागृतीच्या चळवळी उभ्या होण्यात व्हायला हव्यात. पण पाकिस्तानात मात्र "बोलून दाखविणे" हा आता "गप्प रहाण्याच्या" डावपेचांचा भाग होऊ लागला आहे.
This Marathi article is my translation of the original English-language article "In the realm of fear" written by Ms Huma Yusuf and was published first in DAWN on December 5, 2011. The original English article can be read on the link: http://www.dawn.com/2011/12/05/in-the-realm-of-fear.html
==========================
टिपाः
[१] "वॉल स्ट्रीट जर्नल"चे अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांना २३ जानेवारी २००२ रोजी पळविण्यात आले होते व नंतर १ फेब्रुवारी २००२ रोजी शिरच्छेद करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता.
[२] अगदी अलीकडे सय्यद सलीम शहजाद यांचा ३० मे २०११ रोजी खून करण्यात आला. यात ISI चा हात असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो. या खुनाचा उल्लेख माझ्या ई-सकाळवरील "अमेरिका मुर्दाबाद" या लेखात आलेला आहे.
[३] मुमताज कादरी या सलमान तासीर यांच्या शरीररक्षकाने त्यांना त्यांच्या ईश्वरनिंदेच्या कायद्याविरुद्धच्या (Blasphemy Law) मतप्रदर्शानासाठी मारले होते. त्याची जेव्हा कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी त्याच्यावर गुलाबपुष्पांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला होता!
[४] श्रीमती हुमा युसुफ यांना मी त्यांचा लेख आवडल्याची ई-मेल पाठविली होती, त्यात मी त्यांनी "those who believe India is no more the enemy of Pakistan but are afraid to say so for fear of media backlash & being branded as traitor with honourable exception of Mr Nawaz Sharif" हे वाक्यही लिहायला हवे होते असे लिहिले होते. त्यांनीही तितक्याच मोकळेपणाने "Thank you for writing and for the missing sentence. Best regards, Huma Yusuf" असे उत्तर पाठविले!

No comments:

Post a Comment