Monday 13 June 2011

नवाज शरीफ यांचे समंजस उदगार!

नवाज शरीफ यांचे समंजस उदगार!
सुधीर काळे (sbkay@hotmail.com) जकार्ता.
Tuesday, May 24, 2011 AT 02:05 PM (IST)
Tags: pailteer, Sudhir Kale, jakarta

गेल्या आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या 'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज' या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी 'पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे', असे उदगार काढले. ते पुढे म्हणाले, कीं पाकिस्तानला जर प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकायचे असेल, तर त्याने भारताबरोबरच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन (Re-appraisal) केले पहिजे.
काही वर्षांपूर्वी याच नवाज शरीफ यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण देऊन भारत-पाक मैत्रीचे पहिले पाऊल म्हणून 'लाहोर-दिल्ली बस सेवा' सुरू केली होती.*1) वाजपेयींचे स्वागत करण्यासाठी ते लाहोरला आले होते. त्यांचे हे उदगार फारच महत्त्वाचे आहेत. शरीफ यांना पाकिस्तानी जनतेला त्यांचे हे म्हणणे पटवून देण्यात आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी मनोवृत्तीत बदल करण्यात ज्या दिवशी यश येईल, तो दिवस सुवर्णाक्षरात लिहिला जाईल यात शंका नाहीं. भारतच आपला खराखुरा आणि सर्वोत्तम मित्र आहे, हे पाकिस्तानी लोकांना ते पटवून देऊ शकतील असेच सर्व भारतीयांना वाटेल.
अशा धीट आणि लोकमताच्या सद्यप्रवाहाविरुद्ध भासणार्‍या नवाज शरीफ यांच्या वक्तव्याचे आणि मुत्सद्दीपणाचे (Statesmanship) मला खरोखरच कौतुक वाटते. या भावनेने जर मूळ धरले, तर ही एक परस्परसहकार्याची मुहूर्तमेढच ठरेल. भारताने जरी मैत्रीचा हात नेहमीच पुढे केलेला असला, तरी दोन्ही देशांत कांहीं अंशी अविश्वासाची भावना आहे. (हल्ली त्यासाठी Trust deficit हा फॅशनेबल शब्द वापरण्यात येतो!) तिला ओलांडून पाकिस्तान आपलाही मैत्रीच हात पुढे करेल काय? मला आशा वाटते, कीं सध्या सर्व बाजूंनी घेरला गेलेला पाकिस्तान भारताच्या सद्यपरिस्थितीवरून योग्य तो बोध घेऊन असे पाऊल उचलेल.
भारताबरोबर मैत्री करायची असेल तर पाकिस्तानला फुकटेपणाची सवय सोडावी लागेल! आजपर्यंत पाकिस्तानला करावा लागणारा खर्च कधीच स्वकष्टाने कमवावा लागलेला नाहीं. मग तो खर्च लष्करी सामुग्रीवरचा खर्च असो, आपल्या देशातील मूलभूत सोयी (infrastructure) असोत किंवा भूकंप, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत! पाकिस्तानने कर्ज जरूर काढावे व ते करारानुसार परतही करावे, पण फुकटची मदत घेऊ नये! कारण फुकटच्या मदतीबरोबर देशाच्या सार्वभौमत्वावर अनेक दबाव येतात व एक तर्‍हेचा मिंधेपणा येतो. तो कुठल्याही परिस्थितीत टाळला पाहिजे.
पाकिस्तानतही काही लोक भारतीयांप्रमाणेच कल्पक, मेहनती आणि कुशल आहेत. शिवाय आपण कित्येक बाबतीत सारखे आहोत. चेहरेपट्टी, पोषाख, विचार करण्याची पद्धत आणि (गोमांस सोडल्यास) खाण्या-पिण्याच्या आवडी, अशा अनेक बाबतीत आपण सारखे आहोत. ज्या दिवशी देश या नात्याने पकिस्तान (आणि पाकिस्तानी जनता) कुठल्याही परिस्थितीत स्वत:च्या पायांवर उभे रहाण्याचा निर्णय घेतील, त्या दिवसापासून तेही आपल्यासारखेच यशस्वी होऊ लागतील.
भारताने टाकलेल्या एका अनुकरणीय पावलाचे उदाहरण मला इथे द्यावेसे वाटते. १९९१ मध्ये भारतालाही एका अत्यंत कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. भारताकडे असलेली विदेशी चलनाची गंगाजळी संपली होती. रोजच्या गरजा भागविण्याचीही भ्रांत पडली होती. अशा परिस्थितीत भारताला आपल्याजवळचे तारण म्हणून बाळगलेले सोने हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जमा करायची नामुष्की सहन करावी लागली होती. तरीही भारताने मोफत मदतीचा स्वीकार न करता सोने पाठविण्याचे पाऊल उचलले. पाठोपाठ नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आर्थिक धोरणात अमूलाग्र व क्रांतिकारक बदल घडवून आणला व भारताला प्रगतीपथावर आणून उभे केले. अशा तर्‍हेच्या निर्णयामुळे भारत आज एक कणखर, काटक आणि निग्रही देश बनला आहे. पाकिस्तानही भारताच्या अशा धोरणांचे अनुकरण करेल व स्वतःला प्रगतीपथावर घेऊन जाईल. 'डॉन' व 'एक्सप्रेस ट्रिब्यून' या सारख्या वृत्तपत्रातील वाचकांच्या प्रतिसादांचा मागोवा घेतल्यास, आज पाकिस्तानची जनता अमेरिकेची मदत नाकारून तिच्याबरोबरचे गुलामीसदृष संबंध तोडून पाकिस्तानने स्वत:च्या पायावर उभे राहावे, अशा मताचे असल्याचे आढळून येईल.
जो मुलूख खरोखर पाकिस्तानचा आहे त्या मुलुखाची अभिलाषा भारताने कधीच धरली नाहीं. याबाबतचा जो गैरसमज पाकिस्तानी जनतेच्या मनात आहे, तो त्यांनी काढून टाकला पाहिजे. सध्या चालू असलेल्या पंचायतीच्या निवडणुकीत गिलानीसारख्या फुटीरवाद्यांच्या चिथावणीला धिक्कारून ७०-८० टक्क्यांच्या प्रचंड प्रमाणात मतदान करून जम्मू-काश्मीरच्या जनतेने आपल्या मनाचा कौलही दिला आहे. असेच दोनेक वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही असेच भरघोस मतदान झाले होते. पाकिस्तानला सद्यपरिस्थितीची जाणीव करून द्यायची हीच योग्य वेळ आहे. पोलाद गरम असतानाच आपल्याला हव्या असलेल्या वस्तूला ’घडवून’ योग्य तो आकार आपण दिला पाहिजे.
पाकिस्तानात काय पद्धतीची ’हवा’ चालू आहे, तेथील विचारवंत कसा विचार करत आहेत हे वाचणे मनोरंजक ठरेल. माझ्या आधीच्या लेखात मी अनेक दुवे दिले होते. खाली दिलेला दुवा वापरून वाचकांना डॉ. तारीक रहमान यांनी एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रात लिहिलेला लेख वाचता येईल. माझ्या मते प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाने हा लेख वाचला पाहिजे.
आता पाकिस्तान-चीन मैत्रीकडे वळूया. गिलानी या मैत्रीला ’सदाबहार’ मैत्री म्हणतात. चीनहून निघता-निघता गिलानींनी तिचा ’निरंतर मैत्री’ असाही उल्लेख केला. चिनी लोक निमंत्रणाला मान देऊन एकाद्या देशात आले कीं ते त्या देशात ’निरंतरपणे’ ठिय्या मारतात. खरे तर त्यांना यासाठी निमंत्रणही लागत नाहीं. हा अनुभव आपल्याला अक्साईचिनबाबतीत आलेलाच आहे. माझ्या मते 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या कालबाह्य प्रणालीवर आधारलेले चीनचे हे धोरण कधीच यशस्वी होणार नाहीं. आपण बांगलादेशातून आपले सैन्य बाहेर काढून सत्ता मुजीबुर रहमान यांना बहाल केली हे पाकिस्तानने विसरू नये. या उलट तिबेटवरची आणखीच घट्ट आवळलेली मगरमिठी चीनच्या ’निरंतन मैत्री’चे प्रतीक आहे हेही पाकिस्तानने विसरू नये. आपला मित्र नीट पारखून निवडावा. सर्वांगीण विचार करता पाकिस्तानला भारताच्या मैत्रीशिवाय पर्यायच नाहीं असे त्यांना पटेल यात मला तरी शंका वाटत नाहीं.
*1) पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केलेल्या 'कारगिल' मोहिमेच्या फाजील दुस्साहसाने ही मैत्री रुळावरून जवळ-जवळ खाली उतरलीच होती. पण पुढे नवाज शरीफना सत्य आणि चूक समजून आली व त्यांनी ही मोहीम मागे घेतली. लाहोरला वाजपेयींच्या स्वागताला न आलेल्यात सर्वात नजरेत भरणारी अनुपस्थित व्यक्ती होती, पाठीत वार करू पाहाणारे मुशर्रफ हीच! पुढे त्यांच्याबरोबर उगीचच समेटाची बोलणी करण्यासाठी त्यांनाच आग्रा शिखर परिषदेसाठी बोलावून त्यांना अस्थानी प्रतिष्ठा देऊन, त्याच्या CEO या बिरुदावलीचे अध्यक्षामध्ये (President) रूपांतर करायची संधी देऊन वाजपेयींनी एक घोडचूकच केली होती!)

------------------------------------
प्रतिक्रिया
On 09/06/2011 10:21 AM hemant said:
मी गेली १० वर्ष अमेरिकेत राहतो....त्यामुळे बरायचं गोष्टी आगदी जवळून पहिली व अनुभवल्या सुधा...मला असं वाटत कि लोकांनी अमेरिकेला इतका डोक्यावर घ्येनाची कांही कारण नाही...ज्या लोकांना किंवा राष्ट्राला स्वाभिमान नाही त्या लोकांची प्रगती कासवाच्या चालीने होते...

On 05/06/2011 12:00 PM POPATRAO BALU SADGIR said:
अति उत्तम लेख! सकाळ वर फारच मोजके लेख असे वाचले.

On 03/06/2011 10:23 AM sanjay said:
अति उत्तम लेख! सकाळ वर फारच मोजके लेख असे वाचले. सुरेश काळे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असा लेख दिला आहे आणि वाचकांनी देखील तो वाचून योग्य प्रतिक्रिया व्यक्त केल्यात , असेच लेखन अनेक समस्या सोडविण्यास योग्य ठरते व ठरेल, प्रामुख्याने आपल्याकडील सामाजिक स्तर व आता असलेल्या अनेक अंतर्गत मुलभूत व पायाभूत समस्या सुधारण्यासाठी असे लेखक व विचारवंत आणि त्यांचे सर्वंकष विचारच उपयोगी ठरतील याची दाखल घेतली जावी.

On 03/06/2011 12:17 AM Sudhir Kale said:
भा-४: फाळणीनंतर उरलेला आपला आजचा भारत शांततेने चालत आहे तसा चालला असता कां हा "आत्याबाईंच्या मिशा"सारखा काल्पनिक प्रश्न नाही तर अस्सल प्रश्न आहे. पण शेजारी म्हणून युद्धखोर पाकिस्तानपेक्षा शांततेने वागणारा पाकिस्तान आपण स्वार्थापोटी निर्मिलाच पाहिजे! पहा विचार करून पटते का! आणि आपण थेट पाठिंबा दिल्यास शरीफ नक्कीच पहिल्या कांहीं निवडणुका हरतील. तेंव्हां त्यांना पाठिंबाही मुत्सद्दीपणे द्यावा लागेल! (धंद्याच्या बाबतीत शरीफ आणि मी एकाच पोलाद धंद्यातले! शरीफ यांचा एक भाऊ मला भेटून गेलेला आहे!) समाप्त

On 03/06/2011 12:13 AM Sudhir Kale said:
भा-३: पण फाळणी किती पाकिस्तान्यांना मान्य होती व आजही आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यात मला प्राविण्य नाहीं पण असा सूर ऐकायला मिळतो, मीही ऐकलेला आहे. आज सुदानचे (मुस्लिम) उत्तर सुदान व (ख्रिश्चन) दक्षिण सुदान असे मताच्या पेटीद्वारा विभाजनही झालेले आहे. त्यादृष्टीने भारताचे विभाजन आपल्याला लाभप्रदच झालेले आहे. जरा विचार कारा! आज जर भारत एकसंध असता तर पाकिस्तानसारखीच आपलीही धर्मांधतेने वाट लागली नसती कां? फाळणीनंतर उरलेला आपला आजचा भारत शांततेने चालत आहे तसा चालला असता कां? (भा-४ पहा)

On 03/06/2011 12:09 AM Sudhir Kale said:
भा-२ त्यांच्यावर दोन्ही हातांनी पैसे उधळणार्‍या अमेरिकेची आर्थिक परिस्थितीही दिवाळखोरीत निघाली नसली तरी त्यांच्या डोक्यावरच्या कर्जाच्या आकड्यातील शून्ये मोजताना चक्करच येते. आज ना उद्या अमेरिकेला आपला हात आखडता घ्यावाच लागेल व हे स्वत: एक पोलाद कारखानदार असलेल्या व पैशाचा व्यवहार समजणार्‍या शरीफना कुणी समजावून सांगायची गरज नाहीं! आज पूर्व जर्मनीवर फाळणी लादली गेली होती, त्यांना ते पसंत नव्हते वगैरे विक्रांत यांचे मुद्दे वाचले. पण फाळणी किती पाकिस्तान्यांना मान्य होती व आजही आहे? (भा-३ पहा)

On 03/06/2011 12:01 AM Sudhir Kale said:
भा-१ विक्रांत-जी , सर्वप्रथम मी स्पष्ट करतो कीं मी एक स्वागतार्ह घटना म्हणून शरीफ यांच्या उद्गारांचा उल्लेख केला. शरीफ हे मूलत: सैन्याच्या पाठिंब्याने IJI या पक्षातर्फे निवडणूक लढले होते (व हरले होते) हे मला चांगले आठवते व तसा उल्लेख 'न्यूक्लियर डिसेप्शन’मध्येही ठळकपणे आहे. आपण जी रशिया/अमेरिका, पूर्व/पश्चिम जर्मनी यांची उदाहरणे दिली आहेत.ती "पैशाचे सोंग आणता न ये" या मराठी म्हणीची सत्यता पटवतात. दिवाळे निघालेल्या रशिया, पूर्व जर्मनी या देशांसारखीच आज पाकिस्तानची हालत आहे. (भा-२ पहा)

On 02/06/2011 07:05 PM Hindustani.... said:
पाकिस्तानशी मैत्री करणं म्हणजे फना काढलेल्या सापापुढे हात पुढे करणे आहे...तो चावणारच..ज्या देशाची स्थापना भारत द्वेषावर झालेली आहे..त्याच्याकडे कसली करताय मैत्रीची अपेक्षा...तुम्हाला विचार मांडायला काय..सीमेवर गोळ्या खाणार्या सैनिकांना विचारा..

On 02/06/2011 10:16 AM vikrant,chicago said:
भाग २.. व्यक्त केली होती. अमेरिका आणि सोविएत मधील शीतयुद्ध कधी संपेल असे वाटले नाही, पण हे झाले. ह्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होवू शकतीलही. आणि त्यामुळेच काळे साहेबांच्या मताबद्दल तथ्य वाटते. पण माझ्या मते महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न,इस्रायेल आणि पालेस्तीन सीमा प्रश्न आणि काश्मीर प्रश्न हे हि प्रतिक्रिया वाचणार्या कोणत्याही वाचकाच्या हयातीत सुटणार नाहीत. हे प्रश्न चिघळत ठेवण्यात दुर्दैवाने बर्याच स्वार्थी लोकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत.

On 02/06/2011 10:02 AM vikrant,chicago said:
काळेसाहेब ह्या विषयातले तज्ञ आहेत आणि त्यांच्या मताचा आदर आहे. परंतु पूर्व आणि पश्चिम जर्मनी ह्या देशातील लोकांमाद्ध्ये धर्म, जात अशा भावना भडकवणार्या गोष्टी नव्हत्या. दोन्ही देशातील आम जनतेला हे विभाजन पसंत नव्हते आणि ते त्यांच्यावर लादले गेले म्हणून नेहमीच खंत होती. बर्लिन भिंत असताना मी दोन्ही जर्मनीला भेट दिली होती आणि तेथील नागरिकांशी सहज चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती. पश्चिम जर्मनीतल्या लोकांना उघडपणे ह्या भिंतीची चीड होती तर पूर्व जर्मनीतील लोकांनी घाबरत खाजगीत ह्याबद्दल नाराजी ..2

On 01/06/2011 09:49 PM योगेश जोशी - बेंगळूरू (Bangalore) said:
सुधीरजी आपला लेख आवडला आणि त्यावरील आपल्या प्रतिक्रियाही. परंतु विभाजित जर्मनी आणि भारत-पाकिस्तान यांची तुलना खरच करता येईल? ज्या युरोप खंडात दोन जर्मन राष्ट्र एकत्र आली त्याच दरम्यान इतर काही राष्ट्र विभाजितही झाली. तसेच दोन कोरियन राष्ट्र आजूनही एकत्र झाली नाहीत.

On 01/06/2011 07:33 AM Sudhir Kale said:
पिनाकिन यांच्या प्रतिसादाचे आधीचे भाग गहाळ झालेला दिसत आहेत.

On 31/05/2011 08:21 PM Pinakin said:
...नकळत आपल्या विरोधात जात आहे. मुळात म्हणजे अमेरिकेशी तोंडदेखले संबंध ठेवणे आणि चीन, रशिया यांचाशी उत्तम संबंध ठेवणे हेच आपल्या फायद्याचे आहे(अमेरिकेमुळेच भारताला दहशतवादाला तोंड द्यावे लागत आहे). चीन मध्ये मोठे दुष्काळी संकट आले आहे. या पावसाळ्यानंतर जमेल तेवढे पाणी साठवून लष्कराच्या मदतीने ते चीन मध्ये नेले पाहिजे.जर एकदा या dragon चा विळखा पडला तर मग तो सोडवणे मात्र खूप कठीण आहे

On 31/05/2011 11:44 AM Sudhir Kale said:
जयंतराव, १) ज्याने 'न्युक्लीयर डिसेप्शन'चे भाषांतर केले आहे त्याला innocent म्हणणे जरासे धार्ष्ट्याचेच होईल! २) पाकिस्तानची जी आज वाट लागली आहे त्यात अमेरिकेशी केलेली फुकटी दोस्तीच कारणीभूत आहे. माझा खालील लेख वाचा! http://www.esakal.com/esakal/20110301/5186804575064434366.हतं ३) आपल्या राष्ट्राचे हितसंबंध जिथे सुरक्षित रहातील अशा राष्ट्राशीच मैत्री करावी. अमेरीकेशीही! पण कुणाचेच मिंधे होऊ नये! ४) फुकट मदत घेऊन परक्याचे युद्ध लढू नये! ५) पाकिस्तानशी मैत्री अपरिहार्य आहे. ती काळाची गरज आहे.

On 31/05/2011 09:02 AM Jayant said:
The author is very innicent. Remenbe Pakistan is no Germany. Grow up. Broaden your horizon. Look beyond Pakistan. You are defined by the friends you keep. Our benchmark should be USA and not Pakistan. (Thank god our young generation is US bound and they dont think about Pakistan)

On 31/05/2011 09:01 AM Sudhir Kale said:
माझ्या जकार्ता पोस्टने प्रकाशित केलेल्या वरील अर्थाच्या पत्राला (http://www.thejakartapost.com/news/2011/05/27/letter-india-pakistan-have-bury-hatchet.html) एका मूळ लाहोरच्या व सध्या जकार्ताचा रहिवासी असलेल्या वाचकाने लिहिलेले उत्तर वाचनीय आहे. जरूर वाचा! http://www.thejakartapost.com/news/2011/05/31/letter-india-pakistan-should-cooperate.html तसेच माझ्या पत्राखाली वाचकांनी दिलेले on-line प्रतिसादही वाचनीय आहेत. Janjua पाकिस्तानी राजदूतावासातला असावेत असे त्याच्या आधीच्या लिखाणावरून वाटते.

On 30/05/2011 08:01 PM Sudhir Kale said:
माझा दुसरा भाग पुन्हा लिहित आहे: आज जर्मनीच्या चेन्सलर असलेल्या आंगेला मेर्केल या मूळ पूर्व जर्मनीच्या आहेत. याला "कालाय तस्मै नम:"च म्हटले पाहिजे. मी भारत-पाकच्या एकीकरणाबद्दल बोलत नसून त्यांनी केवळ चांगले शेजारी म्हणून राहावे एवढेच म्हणत आहे. शिमला करारात एक अलिखित कलम होते कीं आजची LoC ही आंतरराष्ट्रीय सीमा मानावी व दोन्ही देशांनी एकमेकांना त्रास न देता शांतीने जगावे. हे कलम लेखी करायला भुत्तो तयार नव्हते कारण ते निवडणूक हरले असते. पण हे सांगायला आज ते, इंदिरा-जी वा बेनझीर जिवंत नाहींत.

On 30/05/2011 04:20 PM fattesingh gaikwad said:
कालेसाहेब, आपला शरीफ यांचे भारत पाक मैत्री विषयी चा लेख सध्या अशक्य वाटत आसला तरी भविष्यात आसे घडणार नाही असे छाती ठोक पणे म्हणता हि येणार नाही. एक जिना मुळे पाकिस्तानची निर्मिती hou शकते तर एस शरीफ मुळे दोस्ती का घडू शकत नाही? कोणत्या माता-पित्याला आपला तरुण मुलगा लढाईत मृत झालेला आवडतो ? चीन मुस्लीम देश नाही तरी आपले त्याच्याशी वैर आहे, नेपाल हिंदू राष्ट्र असून आपल्याला ते पाण्यात पाहते मग पाकिस्तान्सी i मैत्री का होणार नाही. चला आशा करूया शरीफ लवकर राष्ट्राध्याक्ष्या होवोत.

On 28/05/2011 04:59 PM Yogesh said:
जो मुलूख खरोखर पाकिस्तानचा आहे त्या मुलुखाची अभिलाषा भारताने कधीच धरली नाहीं...हे जरी खरा असला तरी त्याचबरोबर जो मुलूख खरोखर भारताचाआहे त्या मुलुखाची अभिलाषा पाकिस्तानने नेहेमीच धरली आहे...त्याचे काय?आपले जे आओ बच्चो गाणे आहे त्याची कॉपी youtube वर आहे आणि त्यात काश्मीर मिळवायचा आहे असा संदेश आहे...तो बदलला पाहिजे..भारत पाकिस्तान यांच्यातला वाद मिटला तर दोन्ही देशांची प्रगती होईल.पण आपल्या राजकारण्यांच्या हातातल्या डील्स आणि कमिशन जाईल त्याचे काय?आणि अमेरिका,चीन या देशांना खूप नुकसान होईल ना!!!

On 27/05/2011 06:50 PM Sudhir Kale said:
मी एक सत्य घटना सांगतो! १९८८ साली मी हाम्बुर्गला एका माझ्या जर्मन मित्राला विचारले कीं दोन जर्मनी कधी तरी एका होतील काय? (माझ्या वयाच्या लोकांना त्यांच्यातील जुना खुन्नस माहीत असेलच.) माझ्या मित्राने सांगितले कीं माझ्या हयातीत तरी नाहीं कारण आम्ही भोगवादी (materialistic) आहोत तर ते तत्ववादी (dogmatic) आहेत! पुढच्या वेळी आम्ही भेटलो तेंव्हां मी बोलायच्या आधीच तो म्हणाला, "ज्या वेगाने आम्ही एकत्र झाक़्लो त्याने मीच थक्क झालो! समझाने वालेको इशारा काफी है! (भाग-२ पहा)

On 27/05/2011 04:58 AM asmita said:
अभ्यासपूर्ण लेख आहे . पण साध्या भारत पाक क्रिकेट मध्ये सुधा प्रेक्षक इतकी खुन्नस धरतात, इतकी दुष्मनी मनात भरलेली असते . मग तुम्हाला खरच अस वाटत कि हि दुष्मनी संपेन , मनातील कटुता जाईन? हा भाबडा आशावाद नाहीये का ? आम्ही भारतीय असा प्रयत्न तरी करू, पण पाकिस्थानातील जनता अस करू शकेन?

On 26/05/2011 03:26 PM jay said:
लेख सुंदर आहे पण लेखकाचा भाबडेपणा जाणवतो ... पाकिस्तान हा विषय इतका सरळ सोपा नाही... :(

On 26/05/2011 09:58 AM Sudhir Kale said:
In this context, I really admired the courage & statesmanship of out-of-power Nawaz Sharif who urged Pakistani people to stop considering India as their biggest enemy & re-appraise Indo-Pak relations to improve growth. Thus the role of Pakistani intelligentsia like you would be crucial in changing the mindset of Pakistani people. I have written a letter to Jakarta Post on this subject & I will send you the link if it gets published. Contd. 5

On 26/05/2011 09:57 AM Sudhir Kale said:
"Balanced view" seems to be the hallmark of your writing, going by two articles of yours I have read so far. In this article, you have brought out fickleness in the future development of Sino-Pakistani friendship very well. In the end, I wonder whether Pakistan, now itself a budding democracy, should seek friendship with a Chinese totalitarian regime (with natural affection for Pakistani Military brass) or a genuine democracy across its Eastern border. Contd-4

On 26/05/2011 09:55 AM Sudhir Kale said:
From: "Huma Yusuf" To: "K. B. Kale" Thank you for writing. We were also pleased by Mr. Sharif's statement to boost Indo-Pak ties. I think there is a very slow (almost imperceptible) change in the mind of the establishment on these issues, and we can only hope for the best. Best regards, Huma Yusuf On Tue, May 24, 2011 at 9:01 PM, K. B. Kale wrote: Dear Ms. Huma, I read your latest article "Over the Himalayas" and liked it very much. Really excellent! Contd 3

On 26/05/2011 09:54 AM sudhir Kale said:
डॉनवर ज्या निवडक स्तंभलेखकांचे/लेखिकांचे लेख मी नियमित वाचतो (कारण ते समतोल वाटतात) त्यात हाजरा मुमताज, हुमा युसुफ या लेखिका आणि इर्फान हुसेन हा लेखक हे प्रामुख्याने आहेत व त्यांचा एकादा लेख आवडला तर त्यांना मी लिहितोसुद्धा! त्यातल्या श्रीमती हुमा यांना मी लिहिलेली मेल आणि त्यांचे उत्तर अशा दोन्ही मेल्स मी खाली दिल्या आहेत. दोन्ही वाचनीय आहेत. त्यांनाही मला वाटते तसेच वाटत आहे असे दिसते. काळे

On 25/05/2011 06:52 AM Sudhir Kale said:
मी पत्रकारही नाहीं किंवा 'तज्ञ'हि नाहीं. मी एक इंजिनियर आहे व तुमच्यासारखाच एक वाचक. माझ्या मते "सावधान राहून" दोन्ही बाजूच्या जनतेने/सरकारने आपली मानसिकता बदलायची तयारी ठेवायला हवी. समजा उद्या पाकिस्तान आपण पादाक्रांत केला तर या 'व्याह्याने आणलेल्या घोड्या'ला सांभाळू शकू? नाहीं. तो स्वतंत्रच राहिला पाहिजे पण मित्र असला पाहिजे! असो. मी परदेशी जात आहे. त्यामुळे आतापासून एक आठवडा मी नेटवर येऊ शकणार नाहीं. उत्तर देऊ शकलो नाहीं तरी प्रतिक्रिया देता रहा. संधी मिळाल्याबरोबर मी नक्कीच उत्तरे देईन.

On 25/05/2011 01:12 AM abhay said:
सकाळचे काही वाचक आणि काही लेखक नक्की कशात तज्ञ-अनुभवी आहेत हे मला माहित नाही. पण इथे कोणीही कशावरही लेख व मत लिहु शकतो. आणि सकाळ बिचारे सर्व समावेशक धोरण ठेवून छापते. २५-३० वर्षे पत्रकरिता करणारे अथवा स्तंभ लेखन करणारे सुद्धा ठराविक खास विषयाचा भरपूर व्यासंग-अभ्यास करून त्यावरच सूचक पणे लिहितात. धोरणात्मक विषयवर तर शब्द मोजके असतात. असो. माझी प्रतिक्रिया नाही का छापत. चालू द्या.

On 25/05/2011 12:45 AM vikrant,chicago said:
काळेसाहेब, उत्तम लेख! भारताशी हजार वर्षे युद्ध करण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानशी मैत्री आपल्या हयातीत शक्य नाही. जिथपर्यंत मुशर्रफ सारख्या भारत द्वेषाने पछाडलेल्या लबाड कोल्ह्यांचा पाकिस्तानच्या सैन्यावर पगडा आहे तोपर्यंत ह्याबाबतीत प्रगती शक्य नाही. नवाज शरीफ यांना मात्र ते पंतप्रधान असल्यापासून मनापासून भारताशी मैत्री करायची इच्छा होती आणि मुशर्रफनी त्यांच्या आणि आपल्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर आज चित्र वेगळे असते. पाकिस्तानच्या सैन्यामाद्ध्ये जोपर्यंत भारतद्वेष आहे तोपर्यंत हे होणे नाही.

On 24/05/2011 10:18 PM Amruta said:
माझ्यामते पाकिस्तान हा भारताला कर्करोगासारखा आहे. समूळ उच्चाटनाशिवाय बरा होणे हे कदापि शक्य नाही. शेवटी कुत्राचे शेपूट .....

On 24/05/2011 10:17 PM kishan patil said:
सौ चुहे खाके बिल्ली चाली हाज सावधान शत्रू जेव्हा चागले बोलतो तेव्हा काही तरी कट कारस्थान असते हे विसरून चालणार नाही .

On 24/05/2011 09:22 PM abhay said:
मुळातच अंतरराष्ट्रीय संबंध, संरक्षण हा गुंतागुंतीचा किचकट विषय. त्यात पाकिस्तान तर शेजारी, शत्रु आणि इस्लामिक. त्यामुळे खूप तोलुन-मापुन आणि अत्यंत अभ्यासपूर्ण -अनुभवयुक्त विचार मांडावे लागतात. त्यातले तज्ञ (बागाईतकर,विजय नाईक, ऐर मार्शल इनामदार, प्रेम झा, श्री शशांक, एस. के. शर्मा, ) देल्ही इथे असलेल्या अनेक अभ्यासु संस्था यांच्याशी नेहमी संपर्कात राहतात. वाचकांच्या प्रतिकिया सारखा साधा विषय नाही.सरळ आणि भावनिक नाहीच नाही.

On 24/05/2011 09:16 PM Suresh said:
काळे साहेब तुमचे लेख खूप अभ्यास पूर्ण असतात. या विषयावर तुमचा व्यासंग मोठा आहे. परंतु पाकिस्तानशी मैत्रीची शक्यता हा तुमच्या लेखाचा विषय तरी कशी बनली याचे मला आश्चर्य वाटते. "पाकिस्तानशी मैत्री" या दिवास्वप्नातून आपण भारतीयांनी बाहेर पडावं असं माझं प्रामाणिक मत आहे. ते कधीही होणे नाही.

On 24/05/2011 08:35 PM aditya said:
लेख खूप छान आहे. पाकिस्तान ने जर आपले हे मत कायम thewale तर भारत आणि पाकिस्तान आणि पर्यायाने संपूर्ण आशिया खंडात शांतता राहील.

On 24/05/2011 08:34 PM PRASHANT said:
सततआ गएलयआननतर शहआनपण कआय कआमआचए ?

On 24/05/2011 08:24 PM swati said:
वाह, खूपच चांगले लेख आहेत आपले. अभ्यासू आणि प्राक्टिकॅल!

On 24/05/2011 07:41 PM YuvraJ Patil said:
लेख मस्त लिहिला आहे. थान्क्स सुधीर....

On 24/05/2011 07:01 PM SHIVRAM VAIDYA said:
....हिंदुस्थान मधील तथाकथित सेकुलर नेते दोघानाही हिंदुस्थान-पाकिस्तान संबंध सुधारलेले नको आहेत. दोन्ही देशांनी आपापसात लढण्यातच त्यांची सत्तेची गणिते लपलेली आहेत. जोपर्यंत हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी सामान्य नागरिक आपापसात संबंध वाढवणार नाहीत तोपर्यंत हे राजकारणी दोन्ही देशात वाद निर्माण करून परिस्थिती कायम चिघळत ठेवतील. त्याला तालिबानी, अल-कायदा आणि इतर मुस्लीम अतिरेकी संघटना खतपाणी घालतील.

On 24/05/2011 07:01 PM SHIVRAM VAIDYA said:
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे हे उद्गार योग्यच आहेत. तथापि पाकिस्तानी सरकार आणि लष्कर दोघेही नेहमीच हिंदुस्थान विरुद्ध गरळ ओकून पाकिस्तानी जनतेला गुमराह करत आलेले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोर बस सुरू करून हिंदुस्थान-पाकिस्तान संबंधाना नवीन आयाम देण्याचा स्तुत्य प्रयत्न केलेला होता. परंतू पाकिस्तान मधील सरकारने त्याचा गैर फायदा घेतला. तसेच हिंदुस्थान मधील काँग्रेजी नेत्यांनी वाजपेयी यांची खिल्ली उडवली. खरी मेख ही आहे की पाकिस्तान मधील धर्मवेडे मुस्लीम नेते आणि...1....

On 24/05/2011 06:54 PM D. Patil said:
अति उत्तम लेख! सकाळ वर फारच मोजके लेख असे वाचले.

बिन लादेननंतर बिघडले अमेरिका-पाक संबंध

बिन लादेननंतर बिघडले अमेरिका-पाक संबंध
सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
Monday, May 16, 2011 AT 02:00 AM (IST)
Tags: pailteer, sudhir kale, osama bin laden , pakistan , america

१ मे २०११ रोजी (आपला २ मे) अखेरीस ओसामा बिन लादेनला ठार करण्यात अमेरिकेला यश मिळाले. पण या घटनेमुळे पाकिस्तानच्या अमेरिकेबरोबरच्या दगाबाज वागणुकीवरील आणि विश्वासार्हतेवरील (खोट्या) रहस्याचा 'बुरखा’ शेवटी उचलला गेला, ही एक चांगली घटना घडली!
मागे एका लेखात लिहिल्याप्रमाणे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कधीच परस्पर-विश्वासाच्या किंवा परस्परांबद्दलच्या आदरभावनेच्या पायावर कधीच आधारलेले नव्हते, तर तो फक्त 'सोयीसाठी लावलेला म्होतूर'च होता! पाकिस्तानी दुतोंडीपणा केवळ अमेरिका किंवा भारताबरोबरच्या संबंधाबाबतच होता, असे नाहीं तर तो त्यांच्या स्वतःच्या प्रजेबरोबरच्या बाबतीतही होता. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ राजा गिलानी यांचे 'ड्रोन' विमानांच्या वझिरीस्तानमधील हल्ल्यांबाबतचे अलीकडचे विधान! पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत सभासदांनी उठवलेल्या गदारोळाला उत्तर देताना त्यांनी 'आम्ही अमेरिकेला हे हल्ले बंद करायला ठणकावून सांगितले आहे', असे विधान केले. पण दुसर्‍या बाजूला अमेरिकेच्या राजकीय नेत्यांना व मुत्सद्द्यांना सांगितले, की ती फक्त 'बोलाचीच कढी' असून, प्रत्यक्षात ते अशी बंदी घालणार नाहींत. 'द्रोणाचार्यां'चे (ड्रोनला मी तर द्रोणाचार्यच म्हणतो) हल्ले त्यांनी चालूच ठेवावे.
पाकिस्तानचा हा दुटप्पीपणा अनेक वर्षांपासून सुरू आहे. 'न्यूक्लियर डिसेप्शन' या पुस्तकात लेखकद्वय लेव्ही आणि स्कॉट-क्लार्क यांनी याची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. (हे पुस्तक प्रत्येक अमेरिकन, पाकिस्तानी आणि भारतीय नागरिकाने जरूर वाचावे) अगदी अयूब खान हे अध्यक्ष आणि झुल्फिकार अली भुट्टो परराष्ट्रमंत्री असताना (ते पुढे पंतप्रधानही झाले) पाकिस्तानने अमेरिकेची दोस्ती चालू असतानाच चीनशीही चुंबा-चुंबी चालू केली होती. पाकिस्तानने त्यावेळी सीटो (SEATO) आणि सेंटो (CENTO) या लष्करी संघटनांचे सभासदत्व स्वीकारलेले होते. असे असूनही अमेरिकेची पाकिस्तानशी असलेली मैत्री ’जिवश्चकंठश्च’ अशी कधीच नव्हती. त्याचे कारणही पाकच्या दुटप्पीपणाबद्दल अमेरिकेला असलेला संशय हेच होते. भारताने सुरुवातीपासूनच कुणाच्याही लष्करी संघटनेचे सभासदत्व घ्यायचे नाही, असेच ठरविले होते. ना अमेरिकेचे, ना सोवियत संघराज्याचे. त्यामुळे भारताबरोबरच्या संबंधाबाबत अमेरिका नेहमीच बुचकळ्यात पडलेली असायची. कारण भारत धड त्यांच्या कळपातही जात नव्हता आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याइतका नगण्यही नव्हता! याचा परिणाम अमेरिकेच्या पाकिस्तानच्या मैत्रीवर होणे स्वाभाविकच होते व तसेच झाले. भारताविरुद्धच्या युद्धात वापरण्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे व दारूगोळा मिळविण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेशी मैत्री हवी होती. पण अमेरिका पाकिस्तानला लष्करी आणि आर्थिक मदत देत होती ती साम्यवाद्यांशी (communism) लढण्यासाठी. त्यामुळे ही शस्त्रास्त्रे भारताविरुद्ध वापरायला अमेरिकेची बंदी असायची. अशा तर्‍हेने या मैत्रीत सुरुवातीपासूनच दोघांची तोंडे दोन दिशांना होती! आणि काळाबरोबर या दोन देशांमधील तणाव वाढतच गेला होता.
१९७१ मध्ये बांगलादेशच्या निर्मितीच्या युद्धातील लाजिरवाणा पराभव पाकिस्तानला जिव्हारी लागला होता. या युद्धात झालेल्या पराभवाबद्दल पाकिस्तानने अमेरिकेला योग्य वेळी मदत न केल्यामुळे जबाबदार धरले. (तसे पाहता या युद्धात चीननेही पाकिस्तानला मदत केली नव्हती) इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने हे युद्ध इतक्या झटपट आणि निर्णायपणे संपविले, कीं कुणालाही विचार किंवा कृती करायला वेळच मिळाला नाहीं. पण या पराभवामुळे अमेरिका व पाकिस्तान यांच्यातल्या मैत्रीत एक पाचर ठोकली गेली. ती पाचर आजही या दोन देशांतील संबंधांना एका ठराविक पातळीपेक्षा जास्त जवळ येऊ देत नाहीं!
भारताने १९७४ मध्ये 'पोखरण-१'ची आण्विक चाचणी केली. त्यामुळे पाकिस्तानला आणि विशेषतः भुट्टो यांना-धक्काच बसला! त्यांनी लगेच अमेरिकेकडे धाव घेतली आणि भारतीय अण्वस्त्रांपासून संरक्षण मिळावे अशी गळ घातली. पण आपल्या शत्रुत्वाला भिऊन म्हणा किंवा आपल्याशी त्यावेळी शत्रुत्व पत्करायची अमेरिकेची तयारी नव्हती म्हणून म्हणा, अमेरिकेने पाकिस्तानची ही विनंती मान्य केली नाहीं. हेन्री किसिंजर यांनी 'भारताने आण्विक चाचणी घेतली, ही वस्तुस्थिती पाकिस्तानने 'fait accomplished' म्हणून स्वीकारावी असा मानभावी सल्ला दिला. त्यावर भुट्टों म्हणाले, कीं भारताने अणुबाँब बनविला, तर आम्ही (पाकिस्तानी जनता) पाने-गवत खाऊ, भुकेले राहू पण आम्हीही आमचा अणुबाँब बनवूच. आमच्यापुढे दुसरा कुठलाही पर्याय नाहीं. भारताच्या अण्वस्त्राला आमचेही अण्वस्त्रानेच उत्तर असेल'. (If India builds the bomb, we will eat grass or leaves, even go hungry, but we will get one of our own. We have no alternative ...atom bomb for atom bomb).
यापुढे अमेरिकेवर विसंबणे बरोबर नाही, म्हणून भुट्टो यांनी चीनशी दृढ संबंध प्रस्थापित केले. पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीमध्ये चीनचा मोठाच सहभाग होता! डॉ. खान यांनी विघटनशील समृद्ध युरेनियम युरोप व अमेरिकेच्या साह्याने बनविण्यात यश मिळविले असले, तरी अणुबाँबची संरचना (design) त्यांना चीनकडूनच मिळाली होती! भुट्टो यांनी आपल्या मृत्युपूर्व शेवटच्या निवेदनात म्हटले आहे, कीं चीनशी संबंध जोडण्याचे त्यांनी केलेले कार्य त्यांच्या कारकीर्दीतील मोठे कार्य होते!
भुट्टो यांना फाशी दिल्यानंतर जनरल झिया उल हक यांना सर्व पाश्चात्य राष्ट्रांनी वाळीतच टाकले होते. मात्र सर्वच पाकिस्तानी हुकूमशहा सुदैवी ठरले आहेत. ते अतिशय अडचणीत असताना अशी एकादी घटना घडते, की या हुकुमशहांना वाळीत टाकणे तर सोडाच पण उलट लोणी लावण्याची पाळी येते. सोवियत महासंघाने अफ़गाणिस्तानवर आक्रमण केल्यावर झियांचे ’सुगी’चे दिवस आले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी पाकिस्तानात पैसा आणि शस्त्रास्त्रे ओतली आणि रातोरात वाळीत टाकलेले हुकुमशहा झिया हे रीगन यांच्या मांडीला मांडी लावून व्हाईट हाऊसमध्ये पुख्खा झोडून आले. पण दुटप्पीपणा चालू ठेवून झियांनी चीनबरोबरचे पाकिस्तानचे संबंध मात्र वाढवून आणखी दृढ केले. चीनच्या 'संयुक्त राष्ट्र संघटने'तील प्रवेशाच्या वेळी पाकिस्तानने तैवान ऐवजी चीनला अमेरिकेच्या मनाविरुद्ध समर्थन देणारी मध्यपूर्वेतील राष्ट्रांची फळी उभारून अमेरिकेविरुद्ध चीनला उघडपणे मोठीच मदत केली होती. ते उपकार चीनने आजपर्यंत लक्षात ठेवले आहेत. त्याचे पारितोषिक म्हणून पाकिस्तानच्या अणुबाँब निर्मितीत चीनने खूपच मदत केली.
धाकट्या जॉर्ज बुश यांच्या कारकीर्दीत पुन्हा एकदा वाळीत टाकल्या गेलेल्या मुशर्रफना अल कायदाने केलेल्या ९/११ हल्ल्यानंतर जीवदान मिळाले. ते 'दहशतवादाविरुद्धच्या लढाई'तील खंदे पुरस्कर्ते व त्या लढाईतील अमेरिकेचे सच्चा साथीदार आणि बिनीचा शिलेदार म्हणून समजले जाऊ लागले. इथेही दुटप्पीपणा चालूच होता. मुशर्रफच्या 'कुदेता'नंतरच्या खूपशा अत्युच्च नेमणुकीत अल कायदा व कडव्या इस्लामी लोकांचा सुळसुळाट होता. मुशर्रफ यांच्या काळात अण्वस्त्र तंत्रज्ञानाच्या विक्रीला जणू एकाद्या 'मॉल'चे, 'वॉल-मार्ट'चे स्वरूप आले होते. विक्रीचे काम जोरात सुरू झाले. हे तंत्रज्ञानही इराण, उत्तर कोरिया, लिबिया व इराक या अमेरिकेच्या कट्टर शत्रूंना देण्यात आले. अखेरीस अमेरिकेच्या ते लक्षात आले. त्यांनी जाब विचारताच मुशर्रफने डॉ. खानना 'बळीचा बकरा' बनविले आणि आपल्या पापांचा कबुलीजबाब द्यायला लावून देशाची माफी मागायला लावली.
बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर बर्‍याच प्रमाणात या संबंधांत अंतराय येऊ लागला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातच 'जगातील सर्वात धोकादायक जागा' असा पाकिस्तानचा उल्लेख ओबामांनी खूप वेळा केला व पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मुशर्रफ यांनी मारले नाही, तर 'अमेरिका आपली फौज पाठवून त्यांना मारेल' असेही वचन दिले होते. (अलीकडेच ओसामांना मारून त्यांनी ते खरेही करून दाखविले) निवडून आल्यानंतरच्या पहिल्याच १०० दिवसांनंतरच्या वृत्तपत्रपरिषदेतही त्यांना एका बातमीदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते, कीं पाकिस्तानच्या हातातील अण्वस्त्रे सध्या तरी सुरक्षित आहेत. नजिकच्या भविष्यकाळात पाकिस्तान सरकार कोसळून तालिबानचे किंवा अल कायदाचे सरकार राज्यावर बसेल, अशी शक्यता अजिबात नाहीं. पण तिथले मुलकी सरकार फारच ठिसूळ (very fragile) असून, त्या सरकारकडे शाळा, आरोग्य, कायद्याचे राज्य न्यायसंस्था यासारख्या मूलभूत गरजाही भागविण्याची क्षमता नाहीं म्हणून!
ओबामांना सुरुवातीला पाकिस्तानची मदत नाइलाजास्तव चालू ठेवावी लागली असली, तरी एक तर्‍हेचे audit करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली होती. (हे audit 'सार्वभौमत्वा'सारख्या 'उदात्त' कारणांसाठी पाकिस्तानला नको होते!) त्याच वेळी ही मदत देत असताना पाकिस्तानला 'दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत जोर हवा', असा तगादाही ओबामांनी लावला होता. त्यानुसार पाकिस्तानला 'स्वात' खोर्‍यात लष्कर पाठवून मोहीम आखावी लागली. त्यात अनेक दहशतवादी (व प्रजाजनही) मारले गेले. पण हा जाच पाकिस्तानला मान्य नव्हता. पाकिस्तानात पूर आल्यानंतरही अमेरिकेची मदत भरघोस नव्हती. याबद्दल पाकिस्तानने तक्रार केल्यावर 'तुमचे श्रीमंत नागरिक कर देत नाहींत ते आधी वसूल करा', असा दबावही आणला.
ड्रोन हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या एका पाकिस्तानी नातेवाईकाने अमेरिकेची गुप्तहेर संघटना 'सीआयए'वर खटला भरला. त्या संदर्भात पाकिस्तानी अधिकार्‍यांनी पाकिस्तानस्थित सीआयएच्या केंद्र प्रमुखाचे (जोनाथन बँक्स) नाव गेल्या डिसेंबरमध्ये फोडून एक नवाच पेच निर्माण केला. त्यामुळे बँक्स यांना परत जावे लागले. त्यांच्या जागी आलेल्या नव्या प्रमुखाचे नावही फोडण्यात आल्याचे वृत्त आहे. सध्या 'होय-नाहीं’चा जप चालू आहे!
पकिस्तानबरोबरचे अमेरिकेचे संबंध बिघडत चालले आहेत. या देशांच्या गुप्तहेर व लष्करी संघटना कशा दूर जात आहेत, एकमेकांचे कसे वाभाडे काढत आहेत, याचे वर्णन करणारा एक सुरेख लेख पाकिस्तानच्या 'डॉन' या दैनिकात छापून आला आहे. रेमंड डेव्हिस प्रकरणापासून तर हे संबंध आणखीच बिघडले. लगेच जनरल कयानी यांनी अमेरिकेला आपले 'सल्लागार' (हेर) २५ ते ४० टक्के कमी करायला सांगितले आहे.
आता बिन लादेन पाकिस्तानात अगदी राजधानीपासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील एका गढीवजा घरातच सापडला. जगातल्या दहा सर्वोत्कृष्ट गुप्तहेरखात्यातल्या पहिल्या क्रमांकाच्या गुप्तहेरखात्याला आपल्या नाकाखाली काय चालले आहे हे माहीत नव्हते यावर कुणाचाच विश्वास नाहीं. त्यामुळे बिन लादेन हे लष्कर व पाकिस्तानी गुप्तहेर संघटना 'आयएसआय'च्या 'संरक्षणा'खाली त्यांच्याच एका सुरक्षित घरात रहात होता, असे आरोप पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांतूनही होत आहेत! एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रात एबीसी न्यूजच्या ख्रिस कुओमो यांना दिलेल्या मुलाखतीचा वृत्तांत आलेला आहे. त्यात तर लष्कर आणि 'आयएसआय'मधील कांहीं माथेफिरू लोकांना ही माहिती मिळाली असेल, अशी कबुली देता-देता मुशर्रफ यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना मात्र ही माहिती नव्हती, असे सांगून स्वत:ची या आरोपातून सुटका करून घेतली आहे. पण यात मुशर्रफ यांचा थेट सहभाग नसला तरच नवल! मुशर्रफ यांना मी तर 'लबाड कोल्हा'च म्हणतो! त्यांना माहिती तर असेलच पण यापुढे जाऊन त्यांनी ही जागा सुरक्षित असल्याचे हेरून ती सुचविली असल्यास त्याबद्दल मला तरी आश्चर्य वाटणार नाहीं. या अविश्वासामुळेच ओसामांना ठार करण्याच्या मोहिमेची कांहींही माहिती पाकिस्तान सरकारला अमेरिकेकडून दिली गेली नव्हती. नौदलाच्या 'सील'च्या या तुकडीने दोन हेलीकॉप्टरमधून येऊन ओसामांना ठार केले. ही हेलिकॉप्टर पाकिस्तानच्या राडारलाही न दिसता आत आली, चाळीस मिनिटे कार्यरत होती. बिन लादेन यांना व बरोबरच्या इतर कांहीं पुरुषांना ठार करून, स्त्रियांना व मुलांना तसेच सोडून तिथले सर्व दस्तावेज, संगणक, संगणकाच्या हार्ड डिस्क्स, फ्लॅश डिस्क्स वगैरे पुरावेवजा सर्व साहित्य घेऊन परत पाकिस्तानबाहेर गेल्यानंतर पाकिस्तानी सरकारला त्याबद्दल सांगण्यात आले. याच्या मिरच्याही सरकार, लष्कर व 'आयएसआय'च्या नाकाला चांगल्याच झोंबल्या आहेत!
पाकिस्तानातील 'डॉन', 'एक्सप्रेस ट्रिब्यून' या सारख्या वृत्तपत्रांत खूप टीकात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत. केवळ संपादकीयच नव्हे, तर अनेक स्तंभलेखकांनीही पाकिस्तान सरकारची आणि लष्कर, 'आयएसआय'चीही रेवडी उडविली आहे. आता अमेरिकेचे सांसद उघडपणे पाकिस्तानला देण्यात येणारी मदत थांबविण्याचा आग्रह धरू लागले आहेत. त्यावर कुरघोडी करण्यासाठी लगेच पाकिस्तानी संसदेपुढे भाषण करताना गिलानींनी चीनची 'Pakistan's All-Weather Friend', अशी भलावण करून अमेरिकेला चीनचे बुजगावणे दाखविण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे यापुढे काय होणार याकडे सर्व जगाचे डोळे लागले आहेत.
शेवटी अमेरिकेला अफगाणिस्तानातील त्यांच्या सैन्याला रसद पुरविण्यासाठी कराची-पाकिस्तान-खैबर खिंड-अफगाणिस्तान असा सध्या तरी एकच मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे अमेरिकेला पाकिस्तानशी मैत्री सांभाळावीच लागेल. दुसरा पर्याय आहे, पण त्यासाठी जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान आणि तुर्कमेनिस्तान या देशांशी करार करावे लागतील. तसे करता आल्यास अमेरिका पाकिस्तानला वार्‍यावर सोडू शकेल! (नकाशा पहा)
























-----------------------------
प्रतिक्रिया
On 04/06/2011 11:44 PM swapnil joshi said:
हे जरा आपल्या राज्यकर्त्यांना कळले पहिजे उठसूट नवीन मदत आणि नवीन मैत्रीचे गाणे गातात, त्या अयवजी देशतील जनते वर महगाई पासून वाचवण्याची कृपा करा मणजे ,घरच्या दुधावर शेजारचा बोका वाढणार नाही आणि वर आपल्यालाच म्याव करणार नाही .

On 03/06/2011 11:42 PM Sudhir Kale said:
शिंदेसाहेब, Please get rid of your stouborn ad. It is nothing but अ nuisance हा प्रतिसाद कुणाला उद्देशून आहे हे कळले नाहीं! Ad म्हणजे काय? Advice की Advertisement तेही कळले नाहीं?

On 27/05/2011 02:46 AM shinde said:
Please get rid of your stouborn ad. It is nothing but अ nuisance .

On 24/05/2011 07:54 PM नागेश क्षीरसागर said:
सुधीर काळे महत्वपूर्ण माहिती आपण दिल्याबद्दल आपणास खूप-खूप धन्यवाद !!!!!!!!!!!

On 24/05/2011 01:41 PM Sunny Patil said:
धन्यवाद काळे साहेब, अश्या अप्रतिम आणि अपरिचित माहिती बद्दल. खरे सांगायचे तर मी पहिल्यांदा तुमचा लेख वाचला आणि आता तुमचे लेख शोधू लागलो...खरच अप्रतिम...Awasome

On 23/05/2011 08:30 PM nil shinde said:
इतिहासाचा अभ्यास करता अर्याना [आजचा अफगानिस्तान] हा भारताचा हिस्सा होता.ह्याच्या पश्चिम बाजुकडून जेव्हा हल्ला झाला [अलेक्झांदर किव्वा ९ व्या शतकापासून सुरु झालेले इस्लामिक दहशतवादी हल्ले] तेव्हा तो सहज जिन्खला गेला पण पूर्वे व उत्तर बाजूचे [रणजीत सिंग,मराठे,ब्रिटिश,सोव्हियत,अमेरिका] हल्ले तितकेसे यशस्वी नव्हते.ह्याची अनेक भौगोलिक कारणे आहेत.तुर्क मधून अफगान वर चढ़ाई करणे नक्कीच सोपे गेले असते.पण पश्चिमची सेना अफगान मधे जमीनी लढाई करण्यासाठी असमर्थ आहे.पूर्व एशियाई फौजाच हे काम फत्ते करू शकतात

On 21/05/2011 11:22 AM Sudhir Kale said:
अपरिचित-जी आणि अनिल लांडगे-जी, आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. अपरिचित-जी, भारत-चीन या विषयावर लिहिण्याइतका अभ्यास माझा सध्या तरी नाहीं. पण त्या विषयात डोके घालायचा विचार मात्र आहे!

On 20/05/2011 03:47 PM Aparichit said:
काळे साहेब खूप माहितीपूर्ण लेख आहे तुमचा, अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबध हि तुम्ही खूप सखोलरित्या मांडला आहे. असेच माहितीपूर्ण लिहित राहावे सांगलीकर आणि अमृता ताई यांनी दिलेल्या प्रतिक्रियाशी मी सहमत आहे

On 20/05/2011 10:21 AM anil landge said:
संपवा पाकिस्तान ला. विश्वासअचे नाही.

On 19/05/2011 08:09 PM Sudhir Kale said:
अमृता मॅडम, उदय-जी आणि विक्रांत-जी, आपल्या प्रोत्साहनपर अभिप्रायांबद्दल मनापासून आभार

On 19/05/2011 12:01 AM vikrant,chicago said:
काळेसाहेब, नेहमीप्रमाणे उत्तम आणि अभ्यासपूर्ण लेख. मुत्सद्दीपणात पाकिस्तानला मानावे लागेल. अमेरिकेच्या पैशाने लादेनला, अनेक दहशद्वाद्यांना आणि स्वत: ला पोसून वर चोराच्या उलट्या बोंबा मारून अजून पैसे उकळणे हे पाकिस्तानला वर्षानुवर्षे जमले आहे. पाकिस्तानच्या मदतीतील काही पैसा अमेरिकेतील काही जणांच्या खिशात जात असावा असे मत उघड उघड व्यक्त होऊ लागले आहे. ओबामांनी लादेनला मारण्याचे धाडस केले ते कमालीची गुप्तता राखून हे ह्याच कारणांनी. ओबामांच्या अगदी जवळच्या अनेकांना ह्याची कल्पना दिली नव्हती.

On 18/05/2011 02:47 PM uday mathkar said:
गुड research, very good लिखाण SUDHIR .... पाकिस्तान कधीच निष्पाप असू शकत नाही .. If USA wants to keep Pakistan hiding behind them or cover them then USA will have to pay very high price....

On 18.05.2011 12:02 Amruta said:
लेखन अतिशय अभ्यासपूर्ण आहे. खाली सांगलीकरांनी सांगितल्या प्रमाणे आपण भारत आणि चीन संबंधावर लेख लिहावा अशी अपेक्षा !

On 18/05/2011 08:20 AM Sudhir Kale said:
काजळेसाहेब, आपण म्हणता ते खरे आहे. पाकिस्तानने पब्लिक रिलेशन्समध्ये नेहमीच बाजी मारली आहे! ते कां याचा शोध आपल्या परराष्ट्र खात्याने व आपल्या राजदूतावासांनी (Embassies) घ्यायलाच हवा.

On 18/05/2011 08:16 AM Sudhir Kale said:
शिंदे-जी, काजळे-जी, सुहास-जी, अभी-जी, महेश-जी, गणेश-जी, प्रीतम-जी, मिलिंद-जी, तपकिरे-जी, कानडे-जी, पंकज-जी आणि अस्मिता-मॅडम, आपल्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

On 18/05/2011 08:09 AM Sudhir Kale said:
सांगलीकरसाहेब, नमस्कार! माझ्या शेरो-शायरीचा आपण केलेला उल्लेख वाचून सानंद आश्चर्य वाटले. माझ्या या व्यासंगाशी आपला कुठे आणि कसा परिचय झाला हे समजून घ्यायला आवडेल.

On 17/05/2011 08:01 PM asmita said:
काळेसाहेब , खूपच अभ्यासपूर्ण लेख आहेत . अतिशय सोप्या शैलीत लिहिल्यामुळे विषय समजायला मदत झाली .

On 17/05/2011 03:43 PM पंकज पाटील,चांदवड said:
खूप छान काळे साहेब !!! तुमचे लिखाण खूपच चांगले आहे,तसेच तुमचा आभ्यास पण चांगला आहे .

On 17/05/2011 02:44 PM kanadev said:
काळे साहेब फारच छान लेख आहे.

On 17/05/2011 12:15 PM रतनकुमार तपकिरे said:
खूप छान विश्लेषण ... बऱ्याच दिवसांनी आपला लेख वाचायला मिळाला. (आधीचे २ लेख सुद्धा वाचले.) प्रतिक्रियाही खूप चांगल्या आणि माहितीपूर्ण आहेत... मलातर वाटते हे 'न्यूक्लियर डिसेप्शन' चे पुढचे भाग आहेत. :) ['NUCLEAR DECEPTION' continued ...]

On 17/05/2011 12:08 PM रतनकुमार तपकिरे said:
खूप छान विश्लेषण ... बऱ्याच दिवसांनी आपला लेख वाचायला मिळाला. (आधीचे २ लेख सुद्धा वाचले.) प्रतिक्रियाही खूप चांगल्या आणि माहितीपूर्ण आहेत... मलातर वाटते हे 'न्यूक्लियर डिसेप्शन' चे पुढचे भाग आहेत. :) ['NUCLEAR DECEPTION' continued ...]

On 16/05/2011 06:19 PM Sanglikar said:
काळे साहेब , तुमच्या शेरो शायरी इतकाच हा लेख अभ्यासपूर्ण , विचार करायला लावणारा आहे. चीन भारत संबंध या विषयावर आपण स्वतंत्र लेख लिहावा हि इच्छा .

On 16/05/2011 03:00 PM milindian said:
अमेरिका पाकिस्तानला नाइलाजाने 10 वर्षात 20 अब्ज डॉलर देत असेल तर राजीखुशीने किती देईल याची कल्पनाच नको. अभ्यासपुर्ण लेखाबद्दल मनापासून धन्यवाद.

On 16/05/2011 02:43 PM सुधीर काळे said:
अभीसाहेब, शिंदेसाहबांचे म्हणणे तसे नसावे. ते म्हणत आहेत कीं भारतावर हल्ला करून पाकिस्तानात जाऊन लपून बसलेल्या किंवा हल्ला करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी आपण अमेरिकेला मदत करू शकतो व तशी करावी. उदा. दाऊद, लष्करे-ए-तोयबाचे लोक वगैरे.

On 16/05/2011 01:42 PM pritam said:
फारच सुंदर काळे साहेब तुमचे लेख अन्ना हझारेंच्या उपोषणा सारखे आहेत.

On 16/05/2011 12:48 PM Ganesh Salunke said:
सर आपले लेख कायमच अप्रतिम असतात.. 'न्यूक्लियर डिसेप्शन' ची प्रकरणे मी सकाळ वर सगळी वाचली आहेत.. No doubt I love to read all your article.. Thank you so much.. Ganesh Salunke

On 16/05/2011 12:20 PM Mahesh said:
काळे साहेब, नेहमी प्रमाणे सुंदर लेख आहे... पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या चलाखी आणि मुत्सद्देगिरी पुढे भारतातील कमी पडतात असेच दिसून येते... आपले सरकार पैसे खाणे आणि विरोधी पक्षांना निष्क्रिय करणे यात जास्त वेळ घालवते असे मला वाटते... धन्यवाद ... - महेश

On 16/05/2011 12:14 PM सुधीर काळे said:
भारताने बिन लादेन पाकिस्तानातच आहे असे अमेरिकेला कळवले होते पण ती बातमी अमेरिकन गुप्तहेरखात्याने गांभिर्याने पडताळून पाहिली नाहीं असा वृत्तांत मी अलीकडे ’टाइम्स’मध्ये वाचला होता. खरे-खोटे किती याची मात्र कल्पना नाहीं!

On 16/05/2011 12:04 PM abhi said:
@ Kiran Shinde भारत आपल्याभूमीवर परदेशी सैन्याला पाय ठेवायची मुभा कधीही देणार नाही. आपण स्वयंपूर्ण आहोत आणि आपल्याला अमेरिकन मदतीची (पाकिस्तान्सारखी) गरज नाही. हा सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे. अमेरिका भारतात active दहशतवाद्यांसाठी कधीही मोहीम उघडणार नाही. त्यांचाही फायदा भारत आणि पाकिस्तान यांचात भांडणे असतील तरच होईल. पाकिस्तान भारताविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेची मदत घेतो. त्याबदल्यात पाकिस्तानच्या जमिनीवर अमेरिकन सैनिक उतरू शकतात. म्हणून भारत-पाक भांडणात us चा फायदा आहे.

On 16/05/2011 11:28 AM सुधीर काळे (मूळ लेखक) said:
जकार्ता पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेले माझे पत्रः http://tinyurl.com/6axbcfg कराचीच्या महंमद असीम या वाचकाचे सुरेख पत्र या दुव्यावर वाचा: http://tinyurl.com/3ee5u3y माझे जकार्तातील मित्र श्री राम बहुखंडी यांचे पत्रही जरूर वाचा: http://tinyurl.com/69n7exb

On 16/05/2011 11:26 AM Sudhir Kale (Original Author) said:
पूरक वाचन: भाग ३ Pakistan’s military and elite are holding it back: US analyst -The Express Tribune http://tinyurl.com/3e3tyyj The best intelligence agency in the world ‘ISI’ (Siasi Pakistan-4 Aug 2010) http://tinyurl.com/3m28t42 The Emperors’ Clothes A must-read article by Cyril Almeida in DAWN dt. 6th May 2011 http://tinyurl.com/3l76flh किंवा http://www.dawn.com/2011/05/06/the-emperors-clothes.html DAWN editorial "Osama bin Laden" 3/5/2011 http://www.dawn.com/2011/05/03/osama-bin-laden.html

On 16/05/2011 11:24 AM सुधीर काळे (मूळ लेखक) said:
पूरक वाचन: भाग-२ http://www.dirjournal.com/info/the-worlds-best-intelligence-agencies/ (10 best intelligence agencies in the world) http://tinyurl.com/3yvtzq6 (David Cameron in Bangalore 28th July 2010) http://tinyurl.com/3d5gj4u (Davis Miliband in Washington DC 30th April 2011) Abbottabad Raid-Pakistan upset about being kept in the dark (by Kamran Yousaf-Express Tribune-4th May 2011) http://tinyurl.com/3mp7jtt

On 16/05/2011 11:21 AM सुधीर काळे (मूळ लेखक) said:
पूरक वाचनात रस असणार्‍यांसाठी: (भाग-१) The Emperors’ Clothes हा Cyril Almeida यांनी लिहिलेला लेख सर्वोत्तम आहे! http://tinyurl.com/6zrwq2b (The curious case of Osama bin Laden-Hoodbhoy) http://tinyurl.com/3ghxu8g (Imran Khan in “The Independent”) http://www.smashinglists.com/10-best-intelligence-agencies-in-the-world/ (10 best intelligence agencies in the world) http://tinyurl.com/2b7b8w3 (10 best intelligence agencies in the world)

On 16/05/2011 09:45 AM suhas kulkarni said:
पाकिस्तानचा ढोंगीपणा हा सागल्याना समजत नाही.या बद्दल आपण किंवा भारतीय सरकार निष्क्रियता दाखवते. सर्व जगात किंवा जगातील प्रमुख दैनिकामध्ये याबद्दल काहीच बातमी छापून आणण्यासाठी प्रयास करत नाही. त्यामुळे पाकिस्तानचे फावते. काळेसाहेब तुमच्यामूळे आम्हाला हे कळत आहे. आणि हा विचार mauth publisity मार्फत सगलीकडे पसरेल आणि लवकरच पाकिस्तानमध्ये लोककल्याणाचे सरकार स्ताफन होईल अशी आशा करतो. काळेसाहेब keep it up .

On 16/05/2011 07:49 AM अजित काजळे, Sydney, Australia said:
पण हे अमेरिकन राज्यकर्त्यांना काळात नाही हेच जगाचे दुर्भाग्य आहे.........सध्या मी लंडन मध्ये असताना ज्या बातम्या वाचत होतो त्यावरून ह्या लोकांना पाकिस्तान फारच साधे आणि निष्पाप आहे असे वाटते..........काहीही होणार नाही आणि पाकिस्तानला ह्या पुढेहि मदत मिळत राहणार...........सापाला दुध पाजून विष निर्माण करत आहेत हि पाश्यःत राष्ट्रे

On 16/05/2011 06:07 AM kiran shinde said:
भारत सुद्धा यासाठीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. जर भारताच्या यादी वरील दहशतवादी पाकिस्तअन्मध्ये लपून बसू शकतात तर त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत अमेरिकेला सहकार्य का करू शकत नाही ?

मित्रराष्ट्र म्हणून अमेरिकेचे मूल्यमापन (मूळ लेख)

मित्रराष्ट्र म्हणून अमेरिकेचे मूल्यमापन
सुधीर काळे (sbkay@hotmail.com)
Tuesday, March 01, 2011 AT 02:09 PM (IST)
Tags: pailteer, sudhir kale, us, america, international relation, pakistan, dictatorship
('सप्तरंग'मध्ये प्रसिद्ध झालेला लेख या लेखावरून वरून 'बेतला' आहे)
१९६५ साली जेंव्हा भारत-पाकिस्तान युद्ध झाले तेंव्हापासून मी अमेरिकेच्या दोस्तीच्या प्रामाणिकपणाबद्दल विचार करत आलो आहे व अमेरिकेने टाकलेली परराष्ट्रधोरणाची पावलेही पहात आलो आहे. ६५ सालचे युद्ध जेमेतेम दोन-अडीच आठवडे चालले. पण ’युद्धस्य कथाः रम्याः’ या उक्तीनुसार वृत्तपत्रातील राजकीय बातम्या वाचायला तेथून पहिल्यांदा सुरुवात झाली (तो पर्यंत फक्त क्रिकेटच्या बातम्याच वाचायचो!). मग ही संवय जणू जन्माचीच लागली व ती आजतागायत लागलेलीच आहे.

त्या युद्धाच्या दरम्यान लक्षात आले कीं पाकिस्तानने जरी स्वतःला अमेरिकेच्या गोठ्यात बांधून घेतले असले तरी त्यांना अमेरिकेचा पाठिंबा मनापासून मिळत होता असे वाटत नव्हते. अमेरिकेचे पाकिस्तानला दिलेले समर्थन कांहींसे बिचकत-बिचकतच वाटायचे! अमेरिकेकडून मिळालेली शस्त्रे केवळ साम्यवादाविरुद्धच्या लढाईसाठी पाकिस्तानला दिली गेली होती आणि ती भारताविरुद्ध वापरायला बंदी हे त्यातलेच एक कलम होते! या उलट पाकिस्तानला शस्त्रे हवी होती फक्त भारताविरुद्ध वापरण्यासाठीच व त्यामुळे इथे "परस्पर हितसंबंधांतील संघर्ष" (conflict of interest) स्पष्ट दिसत होता. त्यात दोघांचीही कोंडी व्हायची.

अमेरिकेच्या दुटप्पी वागण्याने पाकिस्तानचे त्यावेळचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुत्तो संतापले व १९६५ च्या पराजयानंतर आणि ताश्कंदच्या मानहानीकारक करारानंतर त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांच्यावर टीका करत परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे ते स्वत:च आधी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष व नंतर पंतप्रधान झाले. भारताने अण्वस्त्राची पहिली चांचणी केली त्यानंतर भुत्तोंनी अमेरिकेकडून अण्वस्त्रविरोधी ’सुरक्षा-छत्र’ मिळविण्याचे खूप प्रयत्न केले पण अमेरिकेने दाद दिली नाहीं. त्यामुळे त्यांनी अमेरिका हे एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र नाहीं असा निष्कर्ष काढून चीनबरोबरचे संबंध घनिष्ट करायला सुरुवात केली. पुढे पाकिस्तानला अण्वस्त्रधारी बनविण्यात अमेरिकेइतकीच चीनचीही मदत झाली.[१]

अमेरिकेचे धोरण असे दिसते कीं जे हुकूमशहा ताटाखालच्या मांजरासारखे त्यांच्या तालावर नाचतात त्यांना आर्थिक आणि लष्करी मदत द्यायची आणि आपल्याच जनतेवर करीत असलेल्या त्यांच्या अन्यायांकडे दुर्लक्ष करायचे. पण या अन्यायांमुळे संतापलेली जनता जेंव्हां बंड करून तख्तापालट करायला उठाव करायची तेंव्हां आपण लोकशाही राष्ट्र असल्याचा आव आणून आपल्याच मित्राला (’पित्त्या’ला) उपदेशामृत पाजत पाजत वार्‍यावर सोडून द्यायचे व नव्या राज्यकर्त्याशी जुळवून घ्यायला पहायचे!

बांगलादेशच्या युद्धातही पाकिस्तानला अमेरिकेच्या अवसानघातकी धोरणाचा प्रत्यय आला होता. पाकिस्तानचा दारुण पराभव होणार हे स्पष्ट दिसत असतानासुद्धा आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवायच्या निर्णयाला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी खूपच उशीर केला. याउलट पूर्व पाकिस्तानविरुद्धची मोहीम इंदिरा गांधींनी इतक्या कार्यक्षमतेने, झपाट्याने आणि तालबद्ध पावले टाकून पार पाडली कीं सातवे आरमार जागेवर पोचायच्या आतच पूर्व पाकिस्तानचा ’खेळ खलास’ झाला होता. पाकिस्तानी राज्यकर्त्यांना हा घाव फारच जिव्हारी लागला होता व त्यातून अमेरिकेची "एक बेभरवशाचा मित्र" अशीच प्रतिमा पाकिस्तानी सरकारात आणि जनतेत निर्माण झाली व ती मला आजतागायत दिसते. आज अशी परिस्थिती आहे कीं पाकिस्तानी राज्यकर्त्यांना अमेरिकेचे पैसे प्यारे आहेत आणि हा ना तो बागुलबोवा दाखवून त्यांच्याकडून पैसे घेणे त्यांना अजीबात वर्ज्य नाहीं, पण पाकिस्तानी जनतेत अमेरिकेबद्दल आस्थेची किंवा कृतज्ञतेची भावना अजीबात नाहीं. उलट एक तर्‍हेचा द्वेषच आहे.

१९७१ ते १९७८ पर्यंतच्या काळात अनेक घडामोडी झाल्या. त्यात भुत्तोंना दिलेली फाशी ही एक महत्वाची घटना होती. त्यावेळी अमेरिकेने भुत्तोंना वाचवायचे जे प्रयत्न केले तेही थातुर-मातुरच (half-hearted) होते. झिया नवे राष्ट्राध्यक्ष झाले तरी अमेरिकेने त्यांना जवळ-जवळ वाळीतच टाकले होते. पण अफगाणिस्तानवर सोवियेत संघराज्याचे आक्रमण झाल्यावर मात्र रातोरात परिस्थिती बदलली. इराण आणि इतर तेल उत्पादक आखाती राष्ट्रे रशियाच्या घशात पडण्याच्या शक्यतेने अमेरिकेला पाकिस्तानची आठवण झाली. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कार्टर यांनी परत पाकिस्तानला थोडी-फार शस्त्रे देण्याचे अमीष दाखवून युद्धात ओढण्याचा प्रयत्न केला पण झिया चांगलेच धूर्त निघाले. त्यांनी अमेरिकेला ठणकावून सांगितले कीं अमेरिकेने "आपण विश्वासू मित्रराष्ट्र आहोत" हे आधी सिद्ध करावे, तरच ते पुढे चर्चा करतील.[१] कार्टर यांनी पाकिस्तानला देऊ केलेल्या मदतीची "peanuts" या शब्दात संभावना करून [२] त्यांनी कार्टरना भेटण्यासाठी "व्हाईट हाऊस"ला जाण्याबद्दल अनुत्साह दाखविला. तोपर्यंत कार्टर निवडणूक हरणार हेही स्पष्ट झाले होते.

रेगन आल्यावर मात्र चित्र पालटले व रेगननी पाकिस्तानला "तुम्ही सोवियेत संघराज्याचा समाचार घ्या आम्ही तुमच्या अणूबाँब बनविण्याच्या पयत्नांकडे पाहून न पाहिल्यासारखे करू" असे वचन दिले. रशियाविरुद्धच्या या युद्धात ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या बाजूने लढले.

रेगन यांची कारकीर्द संपता संपता दोन मोठ्या घटना घडल्या. पाकिस्तान अण्वस्त्रधारी झाले ही पहिली घटना आणि अमेरिकेने वार्‍यावर सोडून दिल्यामुळे संतापलेले ओसामा बिन लादेन अमेरिकेचे कट्टर शत्रू बनले ही दुसरी. आज अमेरिका या दोन्ही घटनांमुळे नक्कीच पस्तावत असेल! पण अमेरिकेची पाकिस्तानला वार्‍यावर सोडण्याची ही कृती त्यांच्या नेहमीच्या "कामापुरता मामा" या मूलभूत धोरणाला धरूनच होती व या धोरणाचा अमेरिकेने केलेला उपयोग बर्‍याच इतर ठिकाणीही दिसून येतो.

या आधी अमेरिकेने असेच इराणच्या शहांनाही वार्‍यावर सोडले होते. इराणचे शहा अमेरिकेचे खंदे पुरस्कर्ते होते. शहांनी जी मनमानी इराणमध्ये केली ती कांहीं प्रमाणात तरी अमेरिकेच्या समर्थनाच्या बळावरच होती. पण या मनमानीमुळे त्यांची लोकप्रियता घटल्यावर अमेरिकेने त्यांच्याशी जी परकेपणाची वर्तणूक केली त्याला तोडच नाहीं. एक तर त्यांना अमेरिकेने भरीव समर्थन दिले नाहीं व त्याचा परिणाम म्हणून शेवटी त्यांना जेंव्हां देश सोडावा लागला तेंव्हां आपुलकीने राजाश्रय देण्यात मागे-पुढे केल्याने शहा आधी इजिप्त, मोरोक्को, मेक्सिको असे हिंडत राहिले व मग शेवटी कर्करोगाने आजारी पडले. त्यावरील शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी ते अमेरिकेत खोट्या नावाने दाखल झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना सोडून आपल्या हवाली करावे अशी मागणी आयातुल्ला खोमेनींच्या सरकारने केली पण असे न करता शहांना पुन्हा अमेरिका सोडण्यास सांगण्यात आले. कदाचित या कृत्यामुळेच इराणने अमेरिकेच्या मुत्सद्द्यांना ओलीस म्हणून धरून ठेवले व शहा तिथून बाहेर पडले तरीही त्यांना सोडले नाहीं. एके काळचा अमेरिकेचा खंदा पुरस्कर्ता असलेल्या आणि मयूर सिंहासनावर बसणार्‍या या सम्राटाने शेवटी एकाद्या निर्वासितासारखा एका देशातून दुसर्‍या देशात फिरत-फिरत शेवटी इजिप्तमध्ये देह ठेवला. त्यांचा शाही इतमानाने दफनविधीही सादात यांनीच केला!

असाच प्रसंग नंतर अमेरिकेने मार्कोस या फिलिपाइन्सच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांवरसुद्धा आणला. त्यांची सद्दी संपल्याबरोबर अमेरिकेने त्यांनाही आधी मनीलातून उचलून अमेरिकेला आणले. पण नंतर मात्र त्यांना एखाद्या पोतेर्‍यासारखे फेकून दिले. शेवटी तेही असेच निर्वासितासारखे अमेरिकेतल्या एका शहरातून दुसर्‍या शहरात फिरत-फिरत शेवटी हवाई बेटावर कालवश झाले.

इंडोनेशियाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष सुहार्तोंनासुद्धा असाच अनुभव आला. साम्यवादाचे कट्टर विरोधक म्हणून एके काळी अमेरिकेच्या गळ्यातला ताईत असलेल्या सुहार्तोंना त्याची सद्दी संपल्यावर अमेरिकेने वार्‍यावरच सोडले. फरक इतकाच कीं सुहार्तो स्वतःच्या देशात बरेच लोकप्रिय होते आणि त्यांची ताकत केवळ सिंहासनावर अवलंबून नव्हती. त्यामुळे ते जकार्तातच राहिले व वार्धक्याने दोन-एक वर्षांपूर्वी निवर्तले. पण अमेरिकेने त्यांनाही हवे तेंव्हा आणि हवे तितके समर्थन दिले नाहीं हे नक्कीच.

अमेरिकेच्या अवसानघातकी धोरणाचा फटका मुशर्रफ यांना व बेनझीरबाईंनाही बसला. एके काळी मुशर्रफना अमेरिकेने अस्पृश्यासारखेच वागविले . इतके कीं एका पत्रकार परिषदेत धाकल्या बुशना मुशर्रफ यांचे नांवही आठवले नाहीं.[१] पण ९/११च्या हल्ल्यानंतर मात्र ते रातो-रात War on terror मधले (धाकल्या) बुशसाहेबांचे लाडके मित्रच बनले! पण त्यांची उपयुक्तता संपल्याबरोबर त्यांच्यामागेही अमेरिकेने लोकशाही आणण्याचा तगादा लावला. त्यांच्यावर बेनझीरबाई अक्षरशः लादल्या गेल्या.[१] पण त्यांची हत्त्या झाल्यावर जेंव्हां निवडणुकीत मुशर्रफ यांचे पानीपत झाले तेंव्हां मुशर्रफनाही अमेरिकेने वार्‍यावर सोडले. आता (सत्ताभ्रष्ट झालेल्या पाकिस्तानच्या इतर नेत्यांप्रमाणेच) मुशर्रफसाहेबही सध्या लंडनमध्ये स्वघोषित हद्दपारीची मजा लुटत आहेत.

अमेरिकेच्या अवसानघाताचे अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे इजिप्तच्या मुबारक यांचे. अन्वर सादात यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलला मान्यता देणारे इजिप्त हे पहिले अरबी राष्ट्र होते. सादात यांची हत्त्या झाल्यावर इजिप्तच्या ’योम किपुर’ युद्धात हवाई दलात खूप पराक्रम गाजविलेले सुप्रसिद्ध फायटर पायलट होस्नी मुबारक त्यांच्या जागी आले. आजवर इस्रायलशी मैत्रीचा करार केलेले व ’योम किपुर’ युद्धानंतर इस्रायलशी पुन्हा युद्ध न केलेले इजिप्त हे पहिले राष्ट्र होते. अमेरिकेचा इजिप्तकडील आर्थिक व लष्करी मदतीचा ओघ चालूच होता. पण मुबारक यांची लोकप्रियता घटल्याबरोबर अमेरिकेने त्यांनाही राजकीय सुधारणा करण्याचे बोधामृत पाजण्यास सुरुवात केली. ते पडल्यावर आलेल्या (कदाचित् तात्पुरत्या) नव्या लष्करी राजवटीलाही अमेरिकेचा जो संदेश गेला त्यात पूर्वीचे सर्व करार (म्हणजे इस्रायल बरोबरचा मैत्रीचा करार) नव्या सरकारने बदलू नयेत अशी अटही घातली आहे.

सध्या अमेरिकेने तेच टुमणे बहरीनच्या राजांच्यामागे लावले आहे. येमेनमध्येही तेच होईल अशी लक्षणे दिसत आहेत. मग शेवटी अमेरिकेशी मैत्रीचा करार कोण आणि कशाला करेल? अमेरिका स्वतःचा फायदा कशात आहे एवढेच व्यवहारीपणे पहाते. न्याय, लोकशाही हे शब्द सोयिस्करपणे वापरते. समर्थन दिलेल्या लष्करशहांचा ती उपयोग करून घेते तर लष्करशहांना अमेरिका आपल्याला वापरते आहे हे माहितही असते आणि मान्यही! तेही पण अमेरिकेचा तसाच वापर करतात.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तान सरकारला माहीत आहे कीं जो वर अमेरिकेला आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांना अफगाणिस्तानला मदत पोचती करायची आहे तो वर (आज तरी) कराची-पेशावर-खैबर खिंड याखेरीज दुसरा कुठलाच सोयीचा रस्ता नाहीं (corridor) व त्यामूळे पाकिस्तानने अमेरिकेची "धरले तर चावते आणि सोडले तर पळते" अशी अवस्था करून टाकली आहे. जोपर्यंत अमेरिका आणि इतर युरोपीय राष्ट्रे तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांबरोबर संगनमत करून तसेच तुर्कस्तान-काळा समुद्र (Black Sea)-अर्मेनिया-अझरबाईजान-कॅस्पियन समुद्र-तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान असा नवा मार्ग तयार करत नाहीं तोपर्यंत पाकिस्तान आपल्या भौगोलिक स्थानाचा (दुरु)पयोग करतच रहाणार यात शंका नाहीं.

आतापर्यंत अमेरिकेची पक्की मैत्री फक्त इंग्लंड आणि इस्रायल या दोन राष्ट्रांबरोबरच आहे. पण या दोघांना तर गमतीने अमेरिकेची ५१वे व ५२वे ’राज्य’च समजण्यात येते!

अलीकडील घटना पहाता अमेरिका भारताशी मैत्री करू इच्छिते आहे असे चित्र दिसत आहे. क्लिंटन यांच्या कारकीर्दीत याला सुरुवात झाली होती पण त्यांच्या कारकीर्दीत ’नारळ फोडण्या’पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत या धोरणाला कांहींसा वेग आला व अणू ऊर्जा करार होण्यात त्याची परिणती झाली. आता ओबामांच्या कारकीर्दीत मैत्री वाढण्याच्या दिशेने खूपच नवी-नवी पावले टाकली जात असलेली दिसत आहेत. मनमोहन सिंग यांच्या अमेरिका भेटीत त्यांना ओबामांच्या तर्फे ’शाही मेजवानी’ (State dinner) दिली गेली. राष्ट्रपती म्हणून ’व्हाईट हाऊस’मधली ही ओबामांनी दिलेली पहिलीच ’शाही मेजवानी’ होती आणि ती भारताच्या पंतप्रधानांना दिली गेली हा केवळ योगायोग म्हणता येणार नाहीं. मग ओबामा इथे आले, भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत कायमच्या सदस्यत्वाबद्दल त्यांनी पाठिंबा दिला, अनेक व्यापारी करार झाले, लष्करी करारही झाले किंवा होऊ घातले आहेत. थोडक्यात अमेरिका भारताबरोबरचे मैत्रीचे संबंध वाढवायला उत्सुक दिसते आहे.

अमेरिकन धोरणातील हा बदल त्यांच्या ’हृदयपरिवर्तना’ने नक्कीच झालेला नाहीं. मग हा बदल एक अजस्त्र बाजारपेठ काबीज करून त्याद्वारे व्यापारवृद्धी साधण्यासाठी होत आहे कीं चीनशी भिडवण्यासाठी त्यांना आपण एक प्यादे म्हणून हवे आहे? ओबामांची कांहीं वाक्ये बोलकी आहेत! पण त्यातलीही "Moreover, the relationship between the United States and India is fundamentally unique -- because, as our strategy explains, we share common interests, but we also share common values, as the world’s two largest democracies, and as countries that are rich in diversity, with deep and close connections among our people." ही वाक्ये अमेरिकेचा "आंतर: कोSपि हेतु:" सांगणारी आहेत. आपल्या लोकशाहीचे कितीही पडघम ओबामा वाजवत असले तरी आशियाई देशात शस्त्र आयातीत सध्यातरी भारत सर्वात मोठा देश आहे आणि तो नुसताच मोठा नाहीं तर नगद पैसे मोजून शस्त्रे विकत घेणारा देश आहे. एरवी आपल्या बहुसंख्य गरजा आयात केलेल्या मालावर भागविणारी अमेरिका स्वतः ज्या मोजक्या गोष्टी निर्मिते त्यात शस्त्रास्त्रनिर्मिती ठळक आहे. ओबामांनी आपल्याबरोबर दोस्ती करण्यामागील कारणांबद्दल कशीही आणि कितीही मखलाशी केली तरी त्यांचे "The United States values our partnership not because of where India is on a map, but because of what we share and where we can go together." हे वाक्य "ताकाला जाऊन भांडे लपविण्या"इतकेच हास्यास्पद दिसते! कारण स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच सर्वात मोठी लोकशाही आपण राबवत आहोत हे अमेरिकेला नक्कीच माहीत होते!

थोडक्यात चीनला शह देण्यासाठी आपला उपयोग अमेरिका करू इच्छिते आहे असेच दिसते. या उलट चीन आपलाही शत्रू असल्यामुळे आणि त्याच्या ’शहाला प्रतिशह’ देण्यासाठी आपल्याला अमेरिकेबरोबरची मैत्री उपयुक्त असल्यामुळे चालत आलेली मैत्री आणि मदत नाकारण्याचा मूर्खपणा आपण करता कामा नये पण आपले तारतम्यही सोडता कामा नये. कारण अमेरिकेने पाकिस्तानचा ’अस्साच’ उपयोग करून घेतला होता आणि पुढे त्याला वार्‍यावर सोडले होते.

मी हे जे वर लिहिले आहे त्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कीं सर्वसाधारण अमेरिकेबद्दलचा आणि अमेरिकन जनतेबद्दलचा माझा अनुभव अतीशय चांगला आहे, पण अमेरिकन सरकारचे वागणे फार वेगळे वाटते. असेही मानले जाते की अमेरिकेचे राष्ट्रपती जास्तीत जास्त ८ वर्षेंच सत्तेवर राहू शकतात. त्यामुळे त्यांच्या धोरणाचा रोख आपल्या कारकीर्दीचे मूल्यमापन कसे केले जाईल (ज्यासाठी इंग्रजीत Legacy म्हणतात) इकडेच जास्त असते, दीर्घ मुदतीच्या अमेरिकेच्या हितसंबंधांकडे त्या मानाने कमी असते असे मानले जाते. त्यामुळे रेगन यांनी रशियाचे तुकडे केले हेच आज लोकांच्या लक्षात आहे, पण उद्या जर एकाद्या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर अण्वस्त्र डागले (देव करो आणि असे न होवो) तरच रेगन यांची अनेक पातकें अमेरिकन जनतेच्या लक्षात येतील. बरेच लोक असेही म्हणतात कीं अमेरिकन सरकारची धोरणे लोकप्रतिनिधींवर वजन आणणार्‍या लोकांचे गटच (Lobbyists) चालवतात. हे अर्थातच सर्वच लोकशाही पद्धतीने चालणार्‍या सरकारांच्याबाबतीत सर्वसाधारणपणे म्हणता येईल, पण कदाचित अमेरिकन सरकारच्या बाबतीत ते जास्त लागू असावे.

शपथविधीनंतरच्या आपल्या भाषणात मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून ओबामा म्हणाले होते कीं मुस्लिम राष्ट्रांनी जर आपली अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी घट्ट आवळलेली मूठ उघडली तर त्यांना अमेरिकेचा दोस्तीचा हात समोर दिसेल. हात तर दिसतोय् पण तो पकडायच्या आधी अमेरिका एक ’दोस्त’ म्हणून विश्वासार्ह आहे का याबद्दल विचार करून मगच त्यांच्याशी हस्तांदोलन करणे श्रेयस्कर ठरेल कारण अमेरिका हे राष्ट्र "न इनकी दोस्ती अच्छी ना दुष्मनी" या वर्गात मोडते. परस्पर गरजेनुसार, गरजेइतकी आणि गरजेपुरती मैत्री जरूर करावी पण तिचे मिंधेही होऊ नये व तिच्यापासून जागरुकही रहावे. प्रत्येक पावलानंतर सारे कांहीं ’आलबेल’ आहे ना हे तपासून पक्के करावे व मग पुढचे पाऊल टाकावे.

खुदही को कर बुलंद इतना की हर तकदीरसे पहले
खुदा बंदेसे खुद पूछे बता तेरी रजा क्या है!
(स्वत:लाच तू इतका शक्तिमान कर कीं तुझा ललाटलेख लिहिताना देव तुलाच विचारेल, "काय लिहू तुझ्या नशीबात?")
---------------------
ता.क. - [१] याबद्दल अधिक माहिती "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकाच्या संक्षिप्त केलेल्या मराठी अनुवादावर आधारित 'ई-सकाळ'वरील मालिकेत वाचायला मिळेल.
[२] कार्टर स्वतः एक Peanut farmer होते व त्यावरून झियांनी हा टोमणा मारला होता असे मानले जाते.

------------------------------
प्रतिक्रिया
On 20/03/2011 05:51 PM Sudhir Kale said:
...त्यांनी कसे वागावे हा उपदेशही मी देत नसून अमेरिकेच्या मागील कामगिरीकडे (track record) कडे लक्ष देऊन आपण शहाणे व्हावे इतकेच

On 20/03/2011 05:51 PM Sudhir Kale said:
दवेंदु-जी, माझ्या लेखाचा रोख अमेरिका किंवा रशियासारख्या महासत्तांनी कुणाशी मैत्री करावी (आणि कां) याबद्दल नसून जो आपल्या कामी आला त्याला आपली गरज संपल्यावर कचरापेटीत टाकण्याबद्दल आहे. अमेरिकेने त्यांना उपयोगी पडलेल्या इराणचे शहा, मार्कोस, सुहार्तो आणि आता मुबारक यांच्याबाब ’गरज सरो मुबारक मरो’ हे धोरण अवलंबिले त्या दृष्टीने रशियाने त्यांना सहकार्य दिलेल्या हुकुमशहाना जास्त बरे वागविले. cont

On 13/03/2011 09:11 PM Davendu Kulkarni said:
.contd.. भारतीय परराष्ट्र धोरण हे नेहमीच धीमेपणाने चालते आणि त्याला कोणी उशिरा सुचलेले शहाणपण वगैरेही म्हणू शकेल, त्याचमुळे अमेरिकेवर भारत आजही पूर्ण विसंबून नाही. अमेरिकेबरोबर मैत्रीला ना नाही पण त्यांची मैत्री हवी म्हणून रशिया, चीन, युरोपशी शत्रुत्व घेण्याची भारताला कधीच गरज वाटली नाही. शेवटी परराष्ट्र धोरण म्हणजे एकमेकांचे बलाबल चपखलपणे जोखण्याचे काम आहे आणि मग त्याची सांगड त्या त्या देशाच्या आर्थिक, लष्करी आणि नागरी ताकदीबरोबर घालावी लागते. भारताची दिशा योग्य वाटते पण वेळ साधता आली पाहिजे.

On 12/03/2011 01:30 AM Davendu Kulkarni said:
contd.. करण्याच्या उद्देशानेच लोकांपर्यंत पोचविली जाते आणि फारच थोड्या लोकांना त्याचा नेमका मतितार्थ कळतो. खरोखर उत्सुकांनी "What we say goes" सारखी पुस्तके जरूर वाचावीत, म्हणजे 'राजनीती' हि सामन्यांच्या नीतीच्या व्याखेपेक्षा कशी वेगळी असते हे समजून येईल. त्यादृष्टीने अमेरिका असो वा रशिया हे 'बळी तो कान पिळी' याच धोरणाने वागणार आणि त्यात काडीचाही बदल होणार नाही. ४) उरला प्रश्न भारताचा. मला वाटते भारतीय परराष्ट्र धोरणकर्त्यांना ह्या गोष्टी पुरेपूर उमजल्या आहेत पण ते गरजेइतके आक्रमक नाहीत...३

On 11/03/2011 02:29 AM Sudhir Kale said:
पानसेसाहेब, अलिप्ततावादाची चळवळ एक तर खरोखर अलिप्त कधीच नव्हती कारण त्याचे संस्थापक नेहरू, नासेर आणि मार्शल टीटो हे साम्यवादाकडे झुकणारे होते. अलिप्ततावादाची कोनशिला होती "सर्वांशी मैत्री". पण परिणाम झाला "कुणीच मित्र उरला नाहीं"मध्ये! त्यामुळे ही अलिप्ततावादाची चळवळ आपोआपच मृत्यू पावली. या उलट पाकिस्तानने आपले पत्ते छान टाकले व अमेरिका आणि चीन या दोन्ही राष्ट्रांशी मैत्रीच केली असे नाहीं तर चीनचा बागुलबोवा वापरून अमेरिकेकडून निर्लज्जपणे वाढीव आर्थिक व लष्करी मदत वसूल करून घेतली!

On 11/03/2011 02:01 AM Sudhir Kale said:
सर्वश्री रितेश, संजय, पल्लवी मॅडम, सुषमा मॅडम: धन्यवाद. रितेश-जी, अमेरिकेने पाकिस्तानला मदत केली नाहीं कारण पाकिस्तानच्या एकनिष्ठतेबद्दल अमेरिकेला नेहमीच शंका होती. याबद्दल न्यूक्लियर डिसेप्शनमध्ये चांगले भाष्य आहे. जरूर वाचावे.

On 11/03/2011 01:54 AM Sudhir Kale said:
महेश जोगळेकर-जी, अगदी मुद्द्याचे बोललात. मी अमेरिकेशी मैत्री करावी याच मताचा आहे कारण चीनचा शत्रू तो आपला मित्र. आज ना उद्या, चीनशी अमेरिका लढणार ही दगडावरची रेघ आहे. कर्जबाजारी असलेल्या व लढून आपले रक्त सांडण्यास राजी नसलेल्या अमेरिकेला आपली गरज लागेलच. दरम्यान पाकिस्तानबरोबरचा मधुचंद्र’ही संपल्यातच जमा आहे. म्हणूनच एका बाजूने अमेरिकेने पुढे केलेला हात झैडकारू तर नयेच पण वहावतही जाऊ नये. आपले हितसंबंध पहात मैत्री करावी. हेतूंबद्दल शंका आल्यास दरवाजाची वाट दाखवावी असेच माझे मत आहे.

On 11/03/2011 01:48 AM Sudhir Kale said:
सर्वश्री सचिन, अजय जोशी, योगिराज, अविनाश, मनोज पवार, मुकुंद टोके, आनंद, संगमेश, सुरेश आणि अर्चना मॅडम, आपल्या प्रोत्साहनपूर्वक प्रतिसादांबद्दल मनापासून आभार!

On 11/03/2011 01:42 AM Sudhir Kale said:
नील शिंदेसाहेब, हजारो वर्षात चीन-भारत युद्ध झाले नाहीं कारण मधला हिमालय ओलांडण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान चीनकडे नव्हते. ते जसजसे प्राप्त झाले तसतशी चीनची मस्ती वळवळू लागली. शिवाय दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत चीनही स्वतंत्र नव्हता व आपल्यावरही इंग्रजांचे राज्य होते हेही विसरू नये. आज प्रक्षेपणांच्या युगात हिमालय आपले संरक्षण करू शकत नाहीं व म्हणूनच चीनला युद्धाची खुमखुमी आलेली आहे.

On 11/03/2011 01:32 AM Sudhir Kale said:
विश्वरूपेसाहेब, Contd. from 1: (Aung San Suu Kyiचा बरोबर उच्चार कसा करतात?) दुसरे म्हणजे अमेरिका हुकुमशहांना मदत करते ही एक बाजू झाली पण अशा हुकुमशहांची सद्दी संपल्यावर त्यांना उकिरड्यावर टाकून देणे म्हणजे अगदी आया-राम-गया-राम न्यायाने त्या हुकूमशहाला लोकशाहीच्या ज्ञानामृताचे डोस पाजणे ही दुसरी काळीकुट्ट बाजू आहे ती त्यांनी सोडावी. कारण अमेरिकेच्या या अशा संधीसाधू वृत्तीची कुणावरच छाप पडत नाहीं. त्यांनी हुकुमशहांना पाठिंबा देणे चालू ठेवलेले बरे असे वाटते.

On 11/03/2011 01:29 AM Sudhir Kale said:
विश्वरूपेसाहेब, दुसर्‍या महायुद्धानंतर माहितीचा प्रसार होण्यात जी क्रांती झाली आणि जी आज आणखीच फुलत गेली आहे त्यामुळे कुठलीही हुकूमशाही ५०-६० वर्षांपेक्षा जास्त टिकत नाहीं. यात रशियाही आला आणि आता चीनमध्येही स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे हुकुमशहांना पाठिंबा देणे आपल्या हितसंबंधांच्या दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून आतबट्ट्याचा व्यवहार ठरेल. म्हणून म्यानमारच्या लष्करशहांना समर्थन देण्याऐवजी ती लष्करशाही उलथून पाडण्यात ओंग सान सू की यांना मदत करणे उचित ठरेल असे माझे मत आहे. Contd..2

On 11/03/2011 01:11 AM Davendu Kulkarni said:
contd.. अथवा नेत्याने वापरणे यात काही चूक आहे असे वाटत नाही. २) लेखकाने मुद्दे समजून देण्यासाठी बरीच उदाहरणे दिली आहेत, ज्यातून अमेरिकेचे राजनैतिक धोरण व्यवस्थित समजते. ज्या हुकूमशहांना हे समजले नाही किंवा थेट जनतेचा पाठींबा नसल्याने जे दबावाला बळी पडले त्यांची होणारी अवस्था हि अमेरिकेच्या धोरणाला अनुसरूनच आहे. ३) काही लोक ओबामांचे गांधीप्रेम किंवा कोणाची भाषणे/ इंटरनेट वगैरे भानगडीत पडताहेत, पण अशा भाबड्या लोकांचे परराष्ट्र धोरणात काहीच महत्व नसते. बरीचशी प्रसारित होणारी माहिती हि प्रसारित...२

On 11/03/2011 12:09 AM Sudhir Kale said:
निनाद-जी, तुम्ही लिहिले आहे ते अगदी १०० टक्के खरे आहे! "परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे" या उपदेशाचा अमेरिकेला नेहमीच विसर पडलेला दिसतो. इराण-इराकमधील ७ वर्षीय युद्धात अमेरिकेने दोन्ही देशांना शस्त्रे पुरविली यापेक्षा अधिक सदसद्विवेकबुद्धीशून्य कृत्य कुठले असू शकते? पण अमेरिका हुकुमशहांना समर्थन देते याबद्दल माझी कांहीच तक्रार नाहीं. त्यांच्या देशाच्या हितार्थ त्यांनी ते करावे! पण त्या हुकुमशहांचीची सद्दी संपल्यावर त्यानाच लोकशाहीचा उपदेश करत कचरा-पेटीत टाकू नये इतकेच मला सांगावेसे वाटते!

On 10/03/2011 06:41 PM Davendu Kulkarni said:
बर्याच दिवसांपूर्वी हा लेख वाचला होता आणि प्रतिक्रियांची वाट पाहत होतो. अकारण फाटे न फोडता केवळ मुद्द्यांच्या दृष्टीने विचार केला तर जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये सांगितलेली (आणि आता विसरत चाललेली) सुत्ररूपी वाक्ये आणि लेखाचे स्वरूप सहज लक्षात येईल. १) अमेरिका असो वा आणखी कोणी देश हे नैतिकता वगैरे गोष्टींचा विचार करत नाहीत, त्यांना केवळ स्वार्थ कळतो, त्यासाठी ते इतिहास आणि पुरावे इ. गोष्टी गाडून टाकायला मागेपुढे पाहत नाहीत. हा माझ्या दृष्टीने वास्तववादी दृष्टीकोन आहे आणि तो कोणत्याही देशाने ..१

On 10/03/2011 05:24 PM Aditya Panse said:
अलिप्त देशांची चळवळ नेमक्या याच कारणासाठी उभारलेली होती. "गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा" ठेवण्यासाठी अलिप्त राष्ट्रांची चळवळ पुन्हा पुनरुज्जीवित करायला पाहिजे.

On 10/03/2011 11:23 AM Sudhir Kale said:
जगात अमेरिकेची प्रतिमा सुधारणे ही ओबामांच्या निवडणूक जाहीरनाम्याची कोनशिलाच होती. Bring change in Washington च्या घोषणेवर जिंकलेल्या ओबामांना राष्ट्रपती बनल्यावर यातले कांहींही जमलेले नाहीं. त्यांच्या कारकीर्दीतही ’अग अग म्हशी’चाच प्रयोग चालू आहे आणि पाकिस्तानला मलिदा चारणेही चालूच आहे. त्यामुळे पाकिस्तानचा मस्तवालपणाही चालू राहिला आहे हे रेमंड डेव्हीसच्या बाबतीत दिसून येत आहे.. म्हणूनच आधीच्या एका प्रतिसादात मी म्हटले होते कीं आपली अमेरिकेशी दोस्ती फ्रान्सच्या धर्तीवर ठेवावी!

On 10/03/2011 11:22 AM Sudhir Kale said:
प्रवासात असल्यामुळे पाच मार्चपासून नेट उपलब्ध नव्हते. आजच वॉशिंग्टन डीसीला पोचलोय्. विनीत-जी, आपले म्हणणे खरे आहे. याच कारणामुळे फ्रान्स ’नाटो’तून बाहेर पडला. अफगाणिस्तानवरील स्वारीत सहभागी होणार्‍या ’नाटो’ने नंतर इराकवरील स्वारीत अमेरिकेला साथ दिली नाही आणि धाकल्या बुशसाहेबांच्या ’एकला चलो रे’ धोरणामुळे तर पश्चिम युरोपीय राष्ट्रांशी जवळ-जवळ वैरच निर्माण होऊ घातले होते.

On 10/03/2011 05:41 AM Milind said:
एकदा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की " We are not pro-Russia, we are not pro-America: we are pro-India!". हे बोल आपण लक्षात ठेवले पाहिजेत. आणि शत्रू-मित्र या चौकटीत न बघता अमेरिकेला एक प्रचंड बाजारपेठ म्हणून पहिले पाहिजे. आज निदान चाळीस कोटी चिनी लोक अमेरिकेला केलेल्या निर्यातीवर मध्यम वर्गात पोचले आहेत, याकडे डोळेझाक करून कसे चालेल?

On 09/03/2011 01:18 AM Vineet said:
अप्रतिम लेख आहे. लेखकाचा अतिशय सखोल अभ्यास दिसतो आहे. इकडे मध्य युरोपात सुद्धा एकंदर जाणकार लोकांचे हेच मत आहे. विशेषत: युरोपमध्ये सुद्धा त्यांनी ह्याच प्रकारची रणनीती वापरली आहे. फक्त बाकीची येथील बलाढ्य राष्ट्रे हे डावपेच हाणून पडतात एवढेच!

On 08/03/2011 11:54 AM hemant said:
सुधा दुरदृस्ठी ठेवून अशा कोणत्याही धोरणाचा अवलंब करावा कि जेणेकरून त्यात भारताचाच फायदा असेल..शेवटी "जो बळी तोच कान पिळी"...

On 08/03/2011 11:51 AM hemant said:
खर तंर आपण अमेरीकेकाधून त्याचं मुचछदि राजकारण शिकायला हव....तस पाहिलं तंर आपल्या महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासातून सुधा ते शिकता येईल...शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलय ना कि चोर-chiltana दिलेल्या शपथा ह्या पाल्याच पाहिजेत असे नाही...पण साधू-संतना, थोर माणसान, व गोर गरिबांना दिलेल्या शपथा जरूर पाळाव्यात. आणि आपण सर्वाना चांगल माहित आहे कि हि अरब राष्ट्र/लोक, पाकिस्तान किती साधू आहेत ते...त्यामुळे मला अमेरिकेची धोरण पटतात आणि भारताने

On 07/03/2011 11:43 AM Anirudha said:
अतिशय छान आणि अभ्यासपूर्ण लेख आहे.

On 07/03/2011 01:49 AM ANIKET VISHWARUPE said:
Cont from last part about Myanmar- भारताचे हित त्या लष्कर शहंशी बोलणी करण्यात आहे. स्वस्त वायू मुळे थोडी महागाई आटोक्यात येण्यात मदत होईल. उद्या जर तिथे खूप मोठी लोकशाही चळवळ झाली तर त्या लष्कर शहांना भारत मदत करणार नाही मग तुम्ही भारताला हि दुटप्पी म्हणणार का? काही लोक आजही म्हणता कि म्यानमार च्या junta ना मदत करू नका. पण जास्त महत्वाचे काय आहे? भारताचे राज्यकर्ते भारताचा फायदा बघणार. तसेच अमेरिकाही त्यांच्या लोकांचा फायदा बघते दुसर्यानाचा नाही.

On 07/03/2011 01:40 AM ANIKET VISHWARUPE said:
खूप वर्षानपासून म्यानमारवर अमेरिकेने बंधने टाकली आहेत आणि भारताने सुद्धा तिथल्या लोकशाही चळवळीला पाठींबा दिला होता. परंतु त्याची परिणती म्यानमार चीनच्या जवळ जाण्यात झाल. आता म्यानमार मध्ये खूप मोठे नैसर्गिक वायूचे साठे मिळाले आहेत. त्यामुळे भारताने आता तिथल्या लष्करी हुकुमशाही सोबत बोलणी सुरु केली आहेत. भारताला सद्ध्या गरज आहे स्वस्त वायूची. तसेच थोडीफार का होईना आपल्या ईशान्य भागातील फुटीरवादी चळवळीला म्यानमार कडून मदत मिळते. ती थांबवायची असेल तर तिथल्या लष्कर शहांना गोंजारणे जरुरीचे आहे.

On 07/03/2011 01:24 AM ANIKET VISHWARUPE said:
मला मान्य आहे कि अमेरिका स्वार्थीपणा दाखवते पण त्यांच्या कडे कोणता दुसरा उपाय आहे? अरब देशान मध्ये जर हुकुमशहाने पाठींबा दिला नाही तर त्यांना तेल कसे मिळणार? दुसरी गोष्ट- एखाद्या देशातील लोकशाही हि त्या देशातल्या लोकांची जबाबदारी आहे, अमेरिकेची किंवा अजून दुसर्या कोणत्या देशाची नाही. जेंव्हा लोकशाही चळवळ होते तेंव्हा अमेरिका मदत करते जनतेला रशिया सारखे हुकुमशा ना मदत तरी नाही करत. भारतात लोकशाही अमेरिका किंवा England मुळे नाही आली ती आली गांधी नेहरू मुळे.

On 06/03/2011 12:41 AM vikrant,chicago said:
..१) काळेसाहेब, नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेख. आपला भारत-पाक संबंधातील गाढ व्यासंग आणि अभ्यास बघून भारतीय परराष्ट्र खात्याने आपला उपयोग करून घ्यायला हवा असे वाटते. नुक्लिअर डिसेप्शन मालिकेनंतर ह्या विषयावर बर्याच दिवसांनी आपले लिखाण वाचनात आले. अमेरिकेतल्या डेमोक्रातिक पक्षाच्या अध्यक्षांना भारताबद्दल नेहमीच झुकते माप द्यावेसे वाटते. केनेडींनी चीन युद्धाच्या वेळी भारताला मदत केली होती. कार्टर य्हांच्या मातोश्री तर विक्रोळीत जन्माला आल्या होत्या. क्लिंटन यांचे तर अनेक भारतीयांशी घनिष्ट संबंध आहेत.

On 05/03/2011 08:38 PM devdatta patil said:
साहेब, भवित्व्याच विचार करणे गरजेच आहे. त्या दृष्टीने तुम्ही जे लिहील ते योग्य आहे असेच लिहित राहा कारण लोकांना अजून कळत नाही कि कोण चांगलं कोण वाईट .दिसत तस नसत म्हणून जग फसत.तुम्ही असच लेख लिहित रहा हि नम्र विनंती .

On 05/03/2011 10:55 AM nil shinde said:
चीन भारताचा शत्रू का आहे ? ६५ पूर्वी हजारो वर्ष भारत चीन ह्या शेजारील संस्कृतीत एकही युद्ध नाही . चीन व भारताने आपले खरे शत्रू कोण आहेत हे ओळखावे

On 05/03/2011 05:39 AM vikrant,chicago said:
..३) धाकल्या बुश यांनी आपल्या मांजरीचे नाव 'इंडिया' ठेवले होते तेव्हा भारताला ताटाखालचे मांजर करण्याचा मनसुबा दिसतो असे मनात आले. अमेरिकेला भारताची जेव्हढी गरज आहे त्यापेख्सा आपल्याला अमेरिकेची गरज जास्त आहे का हा वादाचा भाग आहे. माझ्या मते आपल्याला अमेरिकेची सध्यातरी तेव्हढी गरज नाही. 'गरज सरो आणि वैद्य मरो' असे अमेरिकेचे धोरण आहेच.पाकिस्तान जर मुल्तात्वावाद्यांच्या हातात गेला तर मात्र अमेरिकेला भारताशी हातमिळवणी करण्याशिवाय उपाय नाही. काळेसाहेब, आपण असेच लेख अधूनमधून लिहीत जावे

On 05/03/2011 05:31 AM vikrant,chicago said:
..२) आमचे शिकागोकर ओबमासाहेब तर गांधीवादी आहेत. भारताविषयी त्यांना आकर्षण आहे. रिपब्लिकन अद्ध्यक्ष भारतद्वेष्टे. धाकटे बुश त्याला अपवाद. हे सगळे खरे असले तरी अमेरिका फक्त आपल्यापुरते बघते. 'हिंदी चीनी भाई भाई' सारखी भाबडी दोस्ती अमेरिकेशीच काय पण कुणाशीच करणे योग्य नाही. काही वेळेला शत्रू कडूनही शिकायला मिळते. पाकिस्तानने अमेरिकेला आपल्या बोटावर नाचवले आणि अजूनही पाहिजे ते पदरात पाडून घेऊन स्वत:चीच मनमानी करत आहेत. आपण मुत्सद्दीपणात कमी पडतो. आपण ह्या नव्या दोस्तीचा उपयोग करून घेतला पाहिजे.

On 04/03/2011 11:54 AM Sudhir Kale said:
किशोरकुमारजी, Contd fm Part-1:रशियाने तसाच पाठिंबा पूर्व जर्मनीचे होनेकर यानाही दिला व बर्लिनची भिंत पाडली जाऊन जर्मनीचे एकीकरण झाल्यावर त्यांचा देहांत होईपर्यंत होनेकत मॉस्कोला सन्मानाने राहिले. असा पाठिंबा रशियाने भूतपूर्व चेकोस्लाव्हिया या राष्ट्रांच्या सत्ताधार्‍याप्रमाणे त्यांच्या सर्वच सत्ताधार्‍यांना दिला. नंतर जेंव्हां "पैशाचे सोंग आणता न ये" अशी परिस्थिती रशियावर ओढवली तेंव्हांच त्यांनी मदत थांबविली. पण तेंव्हांही लोकशाही वगैरेची कारणे दिली नाहींत. Send ur ID to sbkay@hotmail.com for mo

On 04/03/2011 11:48 AM Sudhir Kale said:
मॉस्कोवासी किशोरकुमारजी, Part-1 रशियाने पूर्व युरोपमधील अनेक राष्ट्रांशी मैत्रीचे करार केले होते उदा. वॉर्सा करार. रशियाचे फिडेल कॅस्ट्रोसारख्यांशीही जवळचे संबंध होते. पण स्वतःच्याच देशात हुकुमशाही असल्यामुळे वाईट वेळ आल्यावर रशियाला अमेरिकेसारखे लोकशाहीचे पोवाडे गायला लागले नाहींत. हंगेरीत इम्रे नागींच्या नेतृत्वाखाली जनतेने केलेल्या उठावाला रशियाने सत्ताधार्‍यांच्याबाजूने पूर्ण पाठिंबा दिला आणि ती चळवल चिरडून टाकली. (contd-2)

On 04/03/2011 07:05 AM Sameer said:
i have always been highly impressed with your depth of understanding of american foreign policies in middle east and asia especially for India and Pakistan. The underneath interpretations (understanding the unsaid) and consequences of american policies for India and Pakistan is highly commendable...Pls keep writing regularly. Best Regards/sameer

On 04/03/2011 05:38 AM Aniruddha Marathe said:
याची खात्री काय? सध्याच्या काळात माहितीचा प्रसार आणि आर्थिक हितसंबंध ह्या गोष्टी राष्ट्रांचे एकमेकांशी असलेले व्यवहार ठरवतील. दोन दिवसांपूर्वी Robert Gates West Point च्या students समोर म्हणाले कि यापुढील कोणीही सेक्रेटरी ऑफ defense जो अध्यक्षांना आशिया आणि middle इस्ट यामध्ये लष्कर पाठवायला सांगेल त्याचे डोके तपासले पाहिजे. हे प्रत्यक्ष भाषांतर आहे, याचा अर्थ काय? केवळ लष्करी सत्तेच्या मोजमापातून परराष्ट्रीय संबंध ठरू शकत नाहीत. आपल्याला खिते वाटेल पण अमेरिकेत अल जझीरा झपाट्याने वाढत आहे.

On 04/03/2011 05:33 AM Aniruddha Marathe said:
कालेसाहेब हे मान्य आहे कि अमेरिकेचे धोरण हे फक्त स्वार्थावर अवलंबून आहे. पण एक उदाहरण देतो. ओबामांनी आपल्या पहिल्या वर्षात इजिप्त च्या प्रसिद्ध university मध्ये जे भाषण दिले ते संपूर्ण स्वातंत्र्य समानता आणि सहिष्णुता यावर होते. George Bush जेव्हा दुसर्यांदा प्रेसिडेंट झाले तेव्हाचा त्यांचा innaugural address हा middle east मध्ये लोकशाही हा होता. मला विषयाला फाटे पोदायाचे नाहीत पण काळ निश्चित बदलला आहे. रशिया सारखा आपला मित्र नाही हि खरी गोष्ट आहे पण रशिया त पुतीन विरुद्ध कधी बंद होणार नाही ...

On 03/03/2011 11:03 PM VIKRANT said:
Kishorkumar,Moscow, Russia. यांचे मत बरोबर वाटते....रशिया पूर्वीपासून मित्र राष्ट्र आहे. अमेरीकेसोबतची मैत्री मोजून मापून करणे ठीक राहील...

On 03.03.2011 10:08 ninad kulkarni said:
नरेश साहेब एका देशाचा स्वातंत्र्य सैनिक हा दुसऱ्या देशासाठी गुन्हेगार /राजद्रोही असतो . ९/११ नंतर अमेरिकेच्या जनतेला हिरवा दहशतवाद हा शब्द समजला .त्या आधी तो आपल्या सरकारने निर्माण केला . हे चंगळवादी संस्कृती मध्ये मग्न अमेरिकन जनतेला ठाऊक नव्हते. . स्कॉट-क्लार्क साहेब व आपल्याला काळे साहेबांमुळे सत्य परिस्थिती आपल्या समोर आली .

On 03.03.2011 09:59 ninad kulkarni said:
काळे सर उत्तम लेख संयुक्त राष्ट्र ही एक कवी कल्पना समजून अमेरिका जगभर पोलीस पाटीलकी करते . अमेरिकेने जगात कोक /बर्गर विकावे .बक्कल पैसा कमवावा .ह्या गोष्टींचे पर्यावसन दुसऱ्या दिवशी सोन खतात होते .पण ते जेव्हा शस्त्रे विकतात तेव्हा त्याचे पर्यावसन एखाद्याचा हात /पाय /जीव गमावण्यात होते . आता पैसा कसा कमवावा हे त्यांनीच ठरवावे .शस्त्रे न विकताही अनेक देश प्रगत झाले आहेत .

On 03/03/2011 09:54 PM pallavi said:
खूपच चांगला लेख आहे ! अमेरिकाच नव्हे तर कुठल्याही राष्ट्रावर विश्वास टाकण्याआधी भारताने पूर्ण अभ्यास केला पाहिजे व कुठल्याही दडपणाखाली निर्णय न घेता निधड्या छातीने निर्णय घेतले पाहिजेत !!

On 03/03/2011 09:48 PM sushama said:
अप्रतिम प्रतिक्रिया दर्जेदार लेखाला!

On 03/03/2011 08:57 PM Sanjay said:
अमेरिकेने ज्या हुकुम शहांना ज्या वेळी वार्यावर सोडले ते बरोबरच होते, अंतर राष्ट्रीय राजकारणातील मित्र व खरे मित्र यात फरक असणारच. आपल्या इथे आपलेच सरकारी बाबू जनतेचे वैरी आहेत , अजून बाहेरचे लोक काय वाईट करणार आपले ? आतापेक्षा ब्रिटीश शासन बरेच बरे होते कि ???

On 03/03/2011 07:50 PM ritesh said:
लेख फारच चं आहे आणि तंतोतंत पटणारा आहे. पाकिस्तान ला अमेरिकेने संकट काळी १९६५ १९७१ कधीच मदत केली नाही तशी चीन ने पण केली नाही याचा कारण काय असेल बरे ?

On 03/03/2011 06:16 PM Mahesh Joglekar said:
भांडवलशाही + लोकशाही असलेल्या पाश्चिमात्य देशांना अशा परिस्थितीत काय करावे असा खरा प्रश्न पडतो , साम्यवाद किवा धर्मांध सत्तेपेक्षा असे हुकुमशाह बरे असे वाटते ...पण त्याच बरोबर लिबिया सारख्या गोष्टी घडल्या कि अमेरिकेची पंचाईत होते , जशी नाजुबुल्लाः च्या अफगाणिस्तान मध्ये झाली ..साम्यवादाला विरोध करताना धर्मांधांना मदत करून बसले , या विषयवार Chrlie Wilson's War हा चित्रपट जरूर पहा

On 03/03/2011 03:58 PM vishraam gaidhani said:
कालेसाहेब, अप्रतिम लेख.सोपी भाषा,स्पष्ट रचना,तर्क संगांत मांडणी, हि तुमची वैशिष्ट्ये दिसतात. तुमची तुलना संदीप वासलेकर किंवा निळू दामालेंशी होवू शकते. थोडा सोसीअल and एकॉनोमिकॅल आंगले या लेखात हवा होता. मग तो परिपूर्ण ठरला असता. अमेरिकेला एन्कॅश कसे करावे याबद्दल थोडा किंवा चीनला कसे आटोक्यात थ्वावे यावरही विचार असावा.

On 03/03/2011 01:36 PM Sudhir Kale said:
Contd-1: ओबामांना आता सत्तेवर येऊन दोन वर्षें झाली. ही दोन वर्षे ते मुबारकना समर्थन देतच राहिले. मग जनतेचा रोष ओढवल्यावर त्यांना जायचा सल्ला देण्याचा ओबामांना काय अधिकार आहे? या उलट एक मित्र म्हणून आणखी समर्थन देऊन त्यांना वाचवले असते तर 'कामापुरता मामा' असे कुणी म्हणाले नसते. पूर्वी हंगेरीत असाच उठाव झाला तेंव्हां रशियाने कम्युनिस्ट सरकारचा पाठिंबा चालू ठेवून इम्रे नागी यांचे बंड मोडून काढले!

On 03/03/2011 01:28 PM Sudhir Kale said:
मराठेसाहेब, तुमच्या प्रतिक्रियेचे तीन भाग वाचले, पण अजूनही एकादा प्रकाशित व्हायचा राहिला असावा. अमेरिका खर्‍या लोकशाही सरकारांना पाठिंबा देत नाहीं हीच तर शोकांकिका आहे! लोकशाही मार्गाने आलेल्या सरकारांना दर ४-५ वर्षांनी जनतेला सामोरे जावे लागते. हुकुमशहांना याची गरज नसते. त्यामुळे असली सरकारे ’विकत’ घेता येतात आणि अमेरिका हेच करत आलेली आहे! मुख्य मुद्दा तो नाहींय्. एकदा अशा हुकुमशहांना पाठिंबा दिल्यावर जेंव्हां त्यांचे स्थान धोक्यात येते तेंव्हां अमेरिकन सरकार त्याला टाकून देते हा आहे! contd2

On 03/03/2011 05:42 AM Mahesh Joglekar said:
अनिरुद्ध मराठे आपण म्हणता तसे "भारतीय वंशाचे अनेक लोक जे immigrate झाले ते अमेरिकेत influential आहेत. या सर्वांचा परिणाम अमेर्कन धोरणावर होणार हे नक्की. " होएइल अशी अपेक्षा करूयात आणि अमेरिका आणि भारत हे नैसर्गिक मित्र बनोत ( केवळ स्वार्थ साठी नाही) काळे यांनी लेहिलेले झालेल्या घटने बद्दल आहे ..त्यांनी मांडलेला मुद्दा अगदीच cold war विचारसरणी चा नाही वाटत.. अहो australia सारख्या मित्र राष्टाची जनता सुद्धा अमेरिकेचा खरा हेतू काय याच विचार करते, हे खरे कि भारतानी अमेरिकेला आंधळ विरोध पण करू नये

On 03/03/2011 02:34 AM Kishorkumar,Moscow, Russia. said:
सुरक्षा परिषदेतील कायमचे स्थान, पाकला तेवढ्यापुरते रागावणे पण परत अमेरिकेला गेल्यानंतर त्यावर घुमजाव केले? हे सगळे आश्वासने सर्व प्रथम १२६ विमानाचे कोन्त्रक्त भेत्न्यासाठीच. भारताला रशिया हा एकमेव विश्वासाहार्य मित्र आहे. उद्या उठून देव न करो पण जर वार झाले तर अमेरिका प्रथम आपल्याला नाही ते लेक्चर ऐकवेल, नको त्या अटी मान्य करायला लावेल न मग कुठे आपण मदतीची अपेक्षा करू शकू. भारतानेही आता आपला स्वार्थ ओळखून पुढची पावले टाकावीत.परत एकदा धन्यवाद विचार करायला लावणाऱ्या विषयावर लिहिल्याबद्दल.

On 03/03/2011 02:22 AM Kishorkumar, Moscow, Russia said:
सर अतिशय सुरेख लेख आहे. तुमचे न्युक्लीअर दिसिप्षण पुस्तक जरूर वाचेन. आणि कृपया तुमचे या विषयावारातीचे लिखाण असेच चालू ठेवा. भारताचे जगातील स्थान पाहता परराष्ट्र धोरणाविषयी आपण असे उदासीन का? चीन बाबतीत अजूनपण आपण ठोस पावले उचलली नाहीत? लूक इस्ट ची हवा फक्त विझि ट पुरतीच होती का? आणि अमेरिकेबद्दल तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ताक पण फुंकून पिल्यासारखी मैत्री ठेवावी. अमेरिका विश्वासपात्र मुळीच नाही. अताचेच घ्याना. ओबामांनी भारतात आल्यावर अनेक गोष्टी प्रोमिसे केल्या जसे कि विसा प्रश्ना बद्दल आणि

On 03/03/2011 01:56 AM Aniruddha Marathe said:
माहिती हि लोकांपर्यंत वार्यासारखी जाते. आताच्या जमान्यात खायचे आणि दाखवायचे दात फार काळ टिकणार नाहीत. आपण इथे ज्यांना ज्यांना वार्यावर सोडले असे सांगता ते सर्व भ्रष्ट मार्गाने सत्ताधीश झाले होते यात शंकाच नाही. एक तरी असे उदाहरण आहे का कि जिथे खरी लोकशाही अस्तित्वात होती? अमेरिकेने एकदा तरी काश्मीर बाबत मध्यस्थी करायची तयारी दाखवली का? आपण अमेरिकेचे मिंधे होऊ नये हे समजण्यासारखे आहे पण चीनला सामोरे जायचे असेल तर अमेरिकेची मदत असणे अत्यावश्यकच आहे.

On 03/03/2011 01:50 AM Aniruddha Marathe said:
माझी प्रतिक्रिया अर्धवट छापली गेली असे दिसते म्हणून मी छापलेल्या प्रतिक्रियेचा पहिला भाग पुन्हा लिहितो. मला असे वाटते कि कालेसाहेब आपण फक्त लष्करी दृष्टीकोनातून बघत आहात. अमेरिकेचे अनेक उद्योग भारतात आहेत त्यामुळे आपल्याला use and throw करणे हि काही सोपी गोष्ट नाही. इजिप्त च्या संदर्भात आपण ओबामांची वक्तव्ये वाचलीत तर लक्षात येईल कि ओबामाने एकदाही मुबारक विरुद्ध कडक भाषा वापरली नाही. इजिप्त मध्ये जे काही झाले त्यावर अमेरिका अहीच करू शकत नव्हती कारण आजच्या जमान्यात माहिती हि लोकांपर्यंत.. 2

On 03/03/2011 01:19 AM Vijay in US said:
काळे साहेब, मी काही तुम्हला दोष देत नाही, पण सर्व भारतीयांना, त्यात आमच्या सारखे लोक पण आले, कोणालाही संकट काळात मदत करण्याची सवय आहे अगदी आपल्या शत्रू ला पण. जेव्हा भारतावर दहशतवाद्यांनी हल्ले केले तेव्हा एकाही पाकिस्तानी विचारवंताने निषेध केला नाही. अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्यानंतर egypt, palestine, saudi pakistan मधला मध्यम वर्ग खुशीने नाचत होता. आता egypt, tunisia, libiya मधले लोक परत अमेरिकेवर हल्ला करायचं प्रयत्न करतील. ह्या मंडळी बद्दल वाईट वात्याच काहीच कारण नाही एवढच माझा म्हणणं आहे.

On 03/03/2011 12:12 AM Kulkarni said:
सुधीरजी, अमेरिका सिझोप्रेनिक का वागते हे समजून घेण्यासाठी अमेरिका समजणे जरुरी आहे. अमेरिकेतल्या उदार liberal गटाला imperialism मान्य नाही. पण सनातनी गट conservative मात्र अजूनही जुन्या काळात आहे. अमेरिकेचे हित म्हणजे तिथल्या गरीब लोकांचे हित कि धनिक लोकांचे हित? भारत त्यामानाने बरा असे वाटते. कारण सनातनी अल्प आहेत.

On 02/03/2011 10:54 PM सुरेश said:
काळे साहेब धन्यवाद. एक छान लेख वाचायला दिल्याबद्दल तुमचे आणि सकाळ चे मनापासून धन्यवाद. तुमचे न्युक्लीयर डिसेप्शन चे भाषांतर वाचल्यावर मी ते पुस्तक खरेदी करून वाचून काढले. आपण कळ-बहाद्दर लोक फक्त लिहू-वाचू शकतो. प्रत्यक्षात दोऱ्या हलवणारे वेगळेच. तुमचे लेख वाचून कधी न कधी लोक जागृती होयील हीच आशा. अमेरिकेतून लिहिणाऱ्या काही अर्ध्या हळकुंडांच्या प्रतीक्रीयान कडे लक्ष न देणे हेच उत्तम.

On 02/03/2011 09:18 PM Sudhir Kale said:
अमेरिकेतील विजयसाहेब, अहो, हे फक्त मनन आहे. जगात क्रांती घडवून आणण्याची शक्ती कुठली आमच्या कळफलकात (keyboard)? आम्ही विचार करतो आणि मांडतो इतकेच. घाबरू नका! पाकिस्तानमध्ये तर 'दिवाळी' सुरु आहे! पंजाबच्या गवर्नर पाठोपाठ अल्पसंख्यांकांसाठी असलेला मंत्रीही आजच गोळ्या घालून मारला गेला. आता लष्कर नक्कीच घुसेल आणि पुन्हा त्याची हडेलहप्पी सुरु होईल. पाकिस्तान स्वतःच्या करणीनेच संपेल.

On 02/03/2011 08:12 PM Aniruddha Marathe said:
कडाडून विरोध करेल. आज पेप्सी या कंपनीची CEO भारतीय वंशाची व्यक्ती आहे. भारतीय वंशाचे अनेक लोक जे immigrate झाले ते अमेरिकेत influential आहेत. या सर्वांचा परिणाम अमेर्कन धोरणावर होणार हे नक्की. हे सर्व लक्षात घेतले तर कालेसाहेब तुमचे धोरण जुनाट cold war mentality चे आहे असे वाटते. आपण कुठे राहता हे माहित नाही. मी अमेरिकेत राहतो. आपण इजिप्त चे उदाहरण दिलेत. पण मी इथे पहातो कि या facebook आणि twitter च्या जमान्यात ढोंगी पण लपून राहत नाही. ओबामांवर प्रचंड दडपण आणले गेले होस्नी मुबाराकांवर दडपण ...

On 02/03/2011 06:48 PM Sangmesh said:
खूप चांगले लेख आहे , माझा knowledge वाढले ...

On 02/03/2011 06:33 PM Vijay in US said:
काळे साहेब, चर्चिल एकदा म्हणाले होते, Britain does not have permanent friends or enemies, but it has permanent interests, हीच म्हण अमेरिकेच्या बाबतीत लागू पडते. प्रत्येक राष्ट्र आपले हित जपत असते. सध्या पाकिस्तानात मध्यम वर्ग आणि शिक्षण संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कुठल्याही राष्ट्रात मध्यम वर्ग संपला कि राष्ट्र संपते. भारतीय सरकार आणि तुमच्या सारख्या विचारवंताना माझी नम्र विनंती बाजूला राहून मजा बघा आणि मध्ये पडू नका. आगीत तेल ओतता आले तर सोन्याहून पिवळे.

On 02/03/2011 06:23 PM anand said:
Good One .......

On 02/03/2011 04:51 PM Mukund Toke said:
खूपच छान लेख आहे.

On 02/03/2011 04:29 PM Sudhir Kale said:
वालावलकरसाहेब, मी माझ्या कुठल्याच लिखाणात कुणाही नेत्याला अरे-जारे करत नाहीं. ओसामा बिन लादेन यांना आपण क्षुद्र का मानता ते कळत नाहीं. ते जेंव्हां रशियाशी लढले तेंव्हां ते Good boy होते पण आता नाहींत. आज या गृहस्थांनी अमेरिकेला हैराण करून टाकले आहे त्यांना क्षुद्र कसे समजता येईल? ते एक नेते आहेत हे विसरू नये. कांहीं लोक त्यांना मुस्लिमांचा उद्धार करणारे नेते समजतात हे लक्षात ठेवावे. ते आपल्या पद्धतीने लढत आहेत. असो. अरे-जारे न करण्याचा नियम मी माझ्या सर्व लेखनात कटाक्षाने पाळतो.

On 02/03/2011 02:34 PM naresh walavalkar said:
सगळा लेख चांगला आहे पण "रशियाविरुद्धच्या या युद्धात ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या बाजूने लढले." हा उलेख नाही आवडला. मान द्यायला ओसामा बिन लादेन काही संत महत्मा नाही ...येवडी तरी जाणीव तुम्हाला हवी होती..

On 02/03/2011 12:18 PM Manoj Pawar said:
Excellent Article. Expressed our feelings @ usa in exact words

On 02/03/2011 10:31 AM Avinash said:
great Article. Thanks.
On 02/03/2011 08:47 AM yogiraj said:
वेरी गुड अनाल्येसीस

On 02/03/2011 01:03 AM archana said:
अतिशय मस्त लेख आहे....खूपशा गोष्टी नव्याने कळाल्या.....

On 01/03/2011 10:54 PM Malhaar said:
Very informative and interesting indeed. Nice article. I could see how US played games with mid-east countries but I don't get why they did it. Oil? May be co-relation and cause of these behaviors would be interesting enough to know.

On 01/03/2011 06:34 PM ajeyjoshi said:
एक number लेख आहे हा

On 01/03/2011 06:14 PM Sachin said:
काळे सर, आतिशय छान लेख आहे. वाहून आनद वाटला.US विषयी बरीच माहिती कळली असेच लेख लिहित जावे धन्यवाद

मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका? (’रविवार सकाळ’साठी संक्षिप्त केलेली आवृत्ती)


लेखक: सुधीर काळे (sbkay@hotmail.com)
Sunday, April 03, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: saptrang, Sudhir Kale

अमेरिका ज्या कोणत्याही देशाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करते, ते स्वतःचे हित जपण्यासाठीच. स्वतःचा फायदा कशात आहे, एवढाच व्यवहार अमेरिकेला कळतो. न्याय, लोकशाही या शब्दांचा सोईस्कररीत्या वापर करणे, हे तर अमेरिकेसाठी नित्याचेच आहे. अमेरिका भारताशीही अशीच मैत्री करू इच्छित आहे. एक मित्रराष्ट्र म्हणून अमेरिका विविध देशांशी कशी वागली, त्यावर हा झोत...

अमेरिकेचे सर्वसाधारण धोरण असे दिसते की, जे हुकूमशहा ताटाखालच्या मांजरासारखे त्यांच्या तालावर नाचतात, त्यांना आर्थिक आणि लष्करी मदत द्यायची आणि आपल्याच जनतेवर करीत असलेल्या त्यांच्या अन्यायांकडे दुर्लक्ष करायचे. पण या अन्यायांमुळे संतापलेली जनता जेव्हा बंड करून सरकार उलथवण्यासाठी उठाव करायची, तेव्हा आपण लोकशाही राष्ट्र असल्याचा आव आणून आपल्याच मित्राला उपदेशामृत पाजत पाजत वाऱ्यावर सोडून द्यायचे व नव्या राज्यकर्त्याशी जुळवून घ्यायला पहायचे!
बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानला अमेरिकेच्या अवसानघातकी धोरणाचा प्रत्यय आला होता. पाकिस्तानचा दारुण पराभव होणार हे स्पष्ट दिसत असतानासुद्धा आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवायच्या निर्णयाला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्‍सन यांनी खूपच उशीर केला. याउलट पूर्व पाकिस्तानविरुद्धची मोहीम इंदिरा गांधींनी इतक्‍या कार्यक्षमतेने, झपाट्याने आणि नियोजनबद्ध पावले टाकून पार पाडली की, सातवे आरमार जागेवर पोचायच्या आतच पूर्व पाकिस्तानचा "खेळ खलास' झाला होता. पाकिस्तानी राज्यकर्त्यांना हा घाव फारच जिव्हारी लागला होता व त्यातून अमेरिकेची "एक बेभरवशाचा मित्र' अशीच प्रतिमा पाकिस्तानी सरकारमध्ये आणि जनतेत निर्माण झाली व ती मला आजतागायत दिसते.
अमेरिकेने असेच इराणच्या शहांनाही वाऱ्यावर सोडले होते. इराणचे शहा अमेरिकेचे खंदे पुरस्कर्ते होते. शहांनी जी मनमानी इराणमध्ये केली, ती काही प्रमाणात तरी अमेरिकेच्या समर्थनाच्या बळावरच होती; पण या मनमानीमुळे त्यांची लोकप्रियता घटल्यावर अमेरिकेने त्यांच्याशी जी परकेपणाची वर्तणूक केली, तिला तोडच नाही. एक तर त्यांना अमेरिकेने भरीव समर्थन दिले नाही व त्याचा परिणाम म्हणून शेवटी त्यांना जेव्हा देश सोडावा लागला, तेव्हा आपुलकीने राजाश्रय देण्यात धरसोड केल्याने शहा आधी इजिप्त, मोरोक्को, मेक्‍सिको असे हिंडत राहिले व मग शेवटी कर्करोगाने आजारी पडले. त्यावरील शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी ते अमेरिकेत खोट्या नावाने दाखल झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना सोडून आपल्या हवाली करावे, अशी मागणी अयातुल्ला खोमेनींच्या सरकारने केली; पण असे न करता शहांना पुन्हा अमेरिका सोडण्यास सांगण्यात आले. कदाचित या कृत्यामुळेच इराणने अमेरिकेच्या मुत्सद्‌द्‌यांना ओलीस म्हणून धरून ठेवले व शहा तिथून बाहेर पडले, तरीही त्यांना सोडले नाही. एकेकाळचा अमेरिकेचा खंदा पुरस्कर्ता असलेल्या आणि मयूरसिंहासनावर बसणाऱ्या या सम्राटाने शेवटी एखाद्या निर्वासितासारखा एका देशातून दुसऱ्या देशात फिरत फिरत शेवटी इजिप्तमध्ये देह ठेवला!
असाच प्रसंग नंतर अमेरिकेने मार्कोस या फिलिपाइन्सच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांवरसुद्धा आणला. त्यांची सद्दी संपल्याबरोबर अमेरिकेने त्यांनाही आधी मनीलातून उचलून अमेरिकेला आणले; पण नंतर मात्र त्यांना एखाद्या पोतेऱ्यासारखे फेकून दिले. शेवटी तेही असेच निर्वासितासारखे अमेरिकेतल्या एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरत फिरत शेवटी हवाई बेटावर कालवश झाले. इंडोनेशियाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष सुहार्तोंनासुद्धा असाच अनुभव आला. साम्यवादाचे कट्टर विरोधक म्हणून एके काळी अमेरिकेच्या गळ्यातला ताईत असलेल्या सुहार्तोंना त्यांची सद्दी संपल्यावर अमेरिकेने वाऱ्यावर सोडले.
अमेरिकेच्या अवसानघातकी धोरणाचा फटका मुशर्रफ यांना व बेनझीर भुट्टो यांनाही बसला. एके काळी मुशर्रफ यांना अमेरिकेने अस्पृश्‍यासारखेच वागविले. इतके की, एका पत्रकार परिषदेत धाकट्या बुशना मुशर्रफ यांचे नावही आठवले नाही! पण 26/11 च्या हल्ल्यानंतर मात्र ते रातोरात "वॉर ऑन टेरर'मधले (धाकट्या) बुशसाहेबांचे लाडके मित्रच बनले! पण त्यांची उपयुक्तता संपल्याबरोबर त्यांच्यामागेही अमेरिकेने लोकशाही आणण्याचा तगादा लावला. त्यांच्यावर बेनझीर भुट्टो अक्षरशः लादल्या गेल्या; पण बेनझीर यांची हत्या झाल्यावर जेव्हा निवडणुकीत मुशर्रफ यांचे "पानीपत' झाले, तेव्हा मुशर्रफ यांनाही अमेरिकेने वाऱ्यावर सोडले. आता (सत्ताभ्रष्ट झालेल्या पाकिस्तानच्या इतर नेत्यांप्रमाणेच) मुशर्रफही सध्या लंडनमध्ये स्वघोषित हद्दपारीची मजा लुटत आहेत.
अमेरिकेच्या अवसानघाताचे अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे इजिप्तच्या मुबारक यांचे. अन्वर सादात यांच्या नेतृत्वाखाली इस्राईलला मान्यता देणारे इजिप्त हे पहिले अरब राष्ट्र होते. सादात यांची हत्या झाल्यावर इजिप्तच्या "योम किपुर' युद्धात हवाई दलात खूप पराक्रम गाजविलेले लढाऊ विमानांचे वैमानिक होस्नी मुबारक त्यांच्या जागी आले. आजवर इस्राईलशी मैत्रीचा करार केलेले व "योम किपुर' युद्धानंतर इस्राईलशी पुन्हा युद्ध न केलेले इजिप्त हे पहिले राष्ट्र होते. अमेरिकेचा इजिप्तकडील आर्थिक व लष्करी मदतीचा ओघ चालूच होता; पण मुबारक यांची लोकप्रियता घटल्याबरोबर अमेरिकेने त्यांनाही राजकीय सुधारणा करण्याचे बोधामृत पाजण्यास सुरवात केली. ते पडल्यावर नव्याने आलेल्या (कदाचित तात्पुरत्या) लष्करी राजवटीलाही अमेरिकेचा जो संदेश गेला, त्यात पूर्वीचे सर्व करार (म्हणजे इस्राईलबरोबरचा मैत्रीचा करार) नव्या सरकारने बदलू नयेत, अशी अटही घातली आहे.
अरबस्तानातील इतर देशांत काय घडतंय?
बहारीन, येमेन आणि लीबिया या तीन देशांतील जनतेची प्रस्थापित सरकारच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू आहे; पण होस्नी मुबारक यांचा अमेरिकेने केलेला अवसानघात पाहून या तीन देशांतील हुकूमशहांनी बंडखोरांवर प्रतिहल्ला चढविला असून, त्यात तिन्ही देशांत मृत्यूने थैमान मांडले आहे. येमेनचे राष्ट्राध्यक्ष सालेह आणि बहारीनचे राजे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातले येमेनचे व बहारीनचे हुकूमशहा अमेरिकेच्या गोटातले असून, मुअम्मर गडाफी हे बहुतेक कुणाशीही जवळचे राजकीय संबंध न ठेवणारे "एकला चलो रे' पंथाचे हुकूमशहा आहेत; पण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत ठराव संमत करून लीबियावर हल्ला करायची गुरगुर करणारी अमेरिका आणि फ्रान्स/इंग्लंड ही पश्‍चिमी राष्ट्रे येमेन/बहारीनबद्दल मात्र "म्यॉंव'च आहेत!
अमेरिका स्वतःचा फायदा कशात आहे, एवढेच व्यवहारीपणे पाहते; न्याय, लोकशाही हे शब्द सोईस्करपणे वापरते, हे ठळकपणे दिसून येते. समर्थन दिलेल्या लष्करशहांचा ती उपयोग करून घेते; तर लष्करशहांना अमेरिका आपल्याला वापरते आहे, हे माहीतही असते आणि मान्यही! तेही पण अमेरिकेचा तसाच वापर करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तान सरकारला माहीत आहे की, जोवर अमेरिकेला आणि इतर पाश्‍चात्य राष्ट्रांना अफगाणिस्तानला मदत पोचती करायची आहे, तोवर कराची-पेशावर-खैबर खिंड याखेरीज दुसरा कुठलाच सोईचा रस्ता नाही. त्यामुळे पाकिस्तानने अमेरिकेची 'धरले तर चावते आणि सोडले तर पळते' अशी अवस्था करून टाकली आहे. जोपर्यंत अमेरिका आणि इतर युरोपीय राष्ट्रे तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांबरोबर संगनमत करून; तसेच तुर्कस्तान-काळा समुद्र-अर्मेनिया-अझरबैजान-कॅस्पियन समुद्र-तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान असा नवा मार्ग तयार करत नाही, तोपर्यंत पाकिस्तान आपल्या भौगोलिक स्थानाचा (दुरु)पयोग करतच राहणार, यात शंका नाही.
अलीकडील घटना पाहता अमेरिका भारताशी मैत्री करू इच्छिते आहे, असे चित्र दिसते. बिल क्‍लिंटन यांच्या कारकीर्दीत ही सुरवात झाली होती; पण त्यांच्या कारकीर्दीत "नारळ फोडण्या'पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. धाकटे बुश यांच्या कारकीर्दीत या धोरणाला काहीसा वेग आला व अणुऊर्जा करार होण्यात त्याची परिणती झाली. आता ओबामांच्या कारकीर्दीत मैत्री वाढण्याच्या दिशेने खूपच नवनवी पावले टाकली जाताना दिसत आहेत. भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अमेरिकाभेटीत त्यांना ओबामांतर्फे "शाही मेजवानी' देण्यात आली होती. राष्ट्रपती म्हणून "व्हाईट हाऊस'मधली ही ओबामांनी दिलेली पहिलीच "शाही मेजवानी' होती आणि ती भारताच्या पंतप्रधानांना दिली गेली, हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. मग ओबामा इथे आले, भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत कायमच्या सदस्यत्वाबद्दल त्यांनी पाठिंबा दिला, अनेक व्यापारी करार झाले, लष्करी करारही झाले किंवा होऊ घातले आहेत. थोडक्‍यात, अमेरिका भारताबरोबरचे मैत्रीचे संबंध वाढवायला उत्सुक दिसते आहे.
असेही मानले जाते की, अमेरिकेचे राष्ट्रपती ठराविक वर्षेंच सत्तेवर राहू शकतात. त्यामुळे त्यांच्या धोरणाचा रोख आपल्या कारकीर्दीचे मूल्यमापन कसे केले जाईल, इकडेच जास्त असतो. शेवटी, अमेरिकेचे परराष्ट्रधोरण कसे असावे, त्यांनी कुणाला समर्थन द्यावे वा देऊ नये, याच्याशी भारताला काहीच देणे-घेणे नाही; पण अमेरिका स्वहितासाठी आपल्याशी (न मागता) मैत्री करू इच्छित आहे, हे चित्र दिसल्यामुळे अमेरिकेच्या धोरणांचा असा अभ्यास करण्याची गरज नक्कीच आहे.
-----------------------
प्रतिक्रिया
On 05/04/2011 10:28 AM Sudhir Kale said:
भाग-३ (शेवटचा): मी अमेरिकाद्वेष्टा मुळीच नाहीं. पण अमेरिकन सरकार आणि अमेरिकन लोक यात कुणीही गल्लत करू नये. अमेरिकन सरकार special interest groups नी वेढलेले असते. रेगन सरकारने स्वार्थी पण अदूरदर्शी धोरणाने पाकिस्तानला अणूबॉम्ब बनवू दिला. तो आज त्यांच्यावरच रोखायला पाकिस्तान तयार झाला आहे. पाकिस्तानला सतत मदत करणारे अमेरिकन सरकार आपल्याला कसे आवडेल? पण अमेरिकन लोक मात्र चांगले आहेत व मैत्रीपूर्ण वागतात. माझी 'न्युक्लीयर डिसेप्शन' ही सकाळवर प्रसिद्ध झालेली मालिका जरुर वाचां म्हणजे सारे कळेल!

On 05/04/2011 10:16 AM Sudhir Kale said:
भाग-२: मेक्सिकोबरोबरचे अमेरिकेचे संबंध चांगले आहेत असे म्हणणे धार्ष्ट्याचेच ठरेल. मादक पदार्थांची अमेरिकेत होणारी आयात आणि बेकायदेशीर घुसणारे मेक्सिकन् लोक या दोन गोष्टी अमेरिकेला डोकेदुखीच आहेत. पण त्याबद्दल माझा अभ्यास एक वेगळा लेख लिहिण्याइतका सखोल नाहीं. पण त्या दोन देशांमधले संबंध फारसे चांगले नाहींत. एकमेकाना सहन करतात इतकेच. जपानबद्दल काय लिहायचे? अमेरिका ही जपानची बाजारपेठच आहे. आज जपान किती स्वतंत्र निर्णय घेऊ शकते याची कसोटी कधी लागलेली ऐकीवात नाहीं. अभयसाहेबांनी जरूर लेख लिहावा!

On 05/04/2011 10:07 AM Sudhir Kale said:
भाग-१: 'पोर्तो रिको'चे वर्णन विकिपिडीयावर "Puerto Rico is an "unincorporated territory" of the United States which according to the U.S. Supreme Court's Insular Cases is "a territory appurtenant and belonging to the United States, but not a part of the United States. However, President Obama's Task Force on Puerto Rico's Status issued a report on March 11, 2011.[73] which suggests that the task force considers Puerto Rico is already a part of the United States". तेंव्हा ते मित्रराष्ट्र नाहीं.

On 03/04/2011 02:51 AM abhay said:
काळे साहेब हुशार, विद्वान,अनुभवी दिसतात. पण अमेरिका द्वेषाने भरलेले वाटतात. त्यमुळे लेख फारच एकांगी आहे. त्याला उत्तर म्हणजे स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. मेक्सिको, जपान,पोर्तो रिको ह्याच्या बरोबर युद्ध करून नंतर ५०-६० वर्षे मित्रत्वाचे उत्तम संबंध आहेत. तीच गोष्ट जर्मनी बद्दल म्हणता येईल. आणि प्रत्येक देशाने स्वहित अगोदर पाहावे हाच राष्ट्रधर्म. आपण अमेरिकेचा योग्य वापर करून घ्यावा. नाही कोण म्हणतेय.