Monday 31 August 2009

पाकिस्तानच्या इतिश्रीची अथश्री?

स्वातमध्ये शरीया लागू झाल्यावर तालिबान समर्थकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला होता

पाकिस्तानी लष्कराने तालिबानपुढे गुडघे टेकल्यामुळे तिथल्या स्वात खोऱयात व वायव्य सरहद्द प्रांतांतील काही भागात शरिया कायदा लागू झाला आहे. त्यामुळे बांगलादेश निर्मितीनंतर पाकिस्तानची पुन्हा एकदा विघटनाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या अशा विघटनाचे भाकित राल्फ पीटर्स या अमेरिकी लष्करतज्ज्ञाने काही वर्षांपूर्वी केले होते.

सर्व गोष्टींचा विचार केल्यास वाटते, की पाकिस्तानी लष्कर आता आपला कमांडर इन चीफ कोण, पाकिस्तानी लष्कर की तालिबान या संभ्रमात पडले आहे असे वाटते. आणि हे सेनाधिकारी अशा नवीन शक्ती समीकरणात सहभागी होतील आणि अशा नव्या शक्ती समीकरणात सहभागी होतील यात शंका नाही.

हे नवे समीकरण पाकिस्तानच्या शेजारी राष्ट्रांना धोकादायक आहे. खासकरुन भारताला, कारण त्यामुळे अल् कायदा आणि तालिबान हे पाकिस्तानचे शत्रू भारताच्या सीमेच्या अधिकच जवळ येतील.

आजवर पाकिस्तानने व त्यांच्या हेरखात्याने आपल्याविरुद्ध एक प्रकारचे गनिमी युद्धच चालविले होते. पण त्याची झळ आता त्यांना स्वतःलाच जाणवू लागली आहे. बेनझीरची हत्या, वेळोवेळी घडणारे आत्मघातकी स्फोट, श्रीलंकेच्या खेळाडूंवरील हल्ला पाहता याची खात्री पटते.

खरं तर पाकिस्तानला हे असे विघटन नको असेल व एक समृद्ध राष्ट्र म्हणून शांततेत रहायचे असेल, तर त्याला भारताबरोबर मैत्री केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पाकिस्तानने भारताबरेबर मैत्री करुन भारताचे अनेक बाबतींत अमुकरण करण्याची तयारी दाखविली पाहिजे. उदा. - खरी-खुरी लोकशाही, स्वतंत्र न्यायव्यवस्था, घटनेनुसार चालणारी राज्यव्यवस्था.

राल्फ पीटर्सच्या भाकितानुसार जर खरोखरंच घटना घडल्या, तर येत्या काही वर्षांत पाकिस्तान आपल्याला एका चिंचोळ्या पट्टीच्या स्वरुपात दिसेल. त्याच्या एका बाजूला विशाल भारत व दुसऱया बाजूला आतापेक्षा मोठा झालेला अफगाणिस्तान दिसेल. आपल्या अफगाणिस्तानबरोबरच्या मैत्रीच्या संबंधांकडे पाहून पाकिस्तान आणि तालिबान थोडेसे चिंताग्रस्त झालेले असून पाकिस्तान सरकारने आतापासूनच पाकिस्तानचे विघटन भारत, अफगाणिस्तान आणि अमेरिकेने मिळून केलेला कट असल्याची कोल्हेकुई सुरु केली आहे.
अमेरिकेने पुढे मागे चीनला शह देण्याच्या धोरणाने भारताबरोबर अणुकरार केल्यामुळे व त्याहीपेक्षा पाकिस्तानला पाकिस्तानला याबाबतीत वेगळी वागणूक दिल्याने व भारताने अफगाणिस्तानच्या पुनिर्मितीत जोमाने भाग घेऊन त्या देशात बरेच भांडवल गुंतविल्यामुळे पाकिस्तान सरकार आधीच राग धरुन आहे. त्यांना माहित आहे, की भारताचे सर्व प्रयत्न अफगाणिस्तानमध्ये इराणच्या सीमेपर्यंत नवे रस्ते बांधून चबाहार या बंदराला जाणारा मुक्त मार्ग मिळविण्याचा आहे, जेणेकरुन पाकिस्तानच्या बंदरावर अवलंबून रहावे लागणार नाही व त्यादृष्टिने पाकिस्तानचे व्यूहात्मक महत्त्व कमी होऊन जाईल. त्यामुळे पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया वाढत आहेत.

http://en.wikipedia.org/wiki/File:Ralph_Peters_solution_to_Mideast.jpg
http://www.nytimes.com/imagepages/2008/11/23/world/23pstan.graf01.ready.html

सुधीर काळे, जकार्ता, इंडोनेशिया

No comments:

Post a Comment