Monday 31 August 2009

पाकिस्तानमधील अराजकाची बीजे कशात?

आज पाकिस्तानात जे अराजक माजले आहे त्याची मूलभूत कारणे शोधली तर एक गोष्ट सहज दिसते की पाकिस्तानने स्वत:च्या खर्चासाठी लागणारे पैसे स्वत: कधीच कमावले नाहीत. कायम कुणा ना कुणापुढे हात पसरायचे व हातात काही ना काही पडतच राहिल्यामुळे 'कमवायची गरजच काय?' अशी स्वभिमानशून्य सवय त्या रष्ट्राला लागली व फुकटची कमाई गोडही वाटू लागली.
प्रत्येक पाकिस्तानी सरकारने अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्रपतींच्या कारकीर्दीत स्वत:चे खिसे फुकटात गरम करून घेतले. पकिस्तानचे "आद्य" हुकूमशहा फील्ड मार्शल अयूब खान यांच्या कारकीर्दीत प्रथम "सीटो" संस्थेचा सभासद म्हणून मागितलेल्या, त्यानंतर जनरल झिया-उल्-हक यांच्या कारकिर्दीत रशियाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून मागितलेल्या व शेवटी जनरल मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत तालिबान आणि अल् कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून मागितलेल्या अमेरिकन लष्करी व वित्तीय मदतीचा ओघ चालूच राहिला.
नुकत्याच झालेल्या अमेरिकावारीत तालिबानशी लढायला लष्कर पाठवायला पैसे नसल्यामुळे अमेरिकेची मदत मिळेपर्यंत आपण फौज पाठवू शकणार नाही, असे निर्लज्जपणे सांगून व त्या युद्धात साधे पोलीस दल पाठवून पाकिस्तानने स्वत:चे हसेच करून घेतले. यातून असा प्रश्न निर्माण होतोच, की इतके दिवस मिळालेले पैसे कुठे गेले? अर्थातच ते भारतासारख्या शांतताप्रिय देशाविरुद्ध युद्धाची तयारी करण्यातच खर्च झाले.
पाकिस्तानने भारताबरोबरच्या वैराचा उगीचच बागुलबुवा केलेला असून भारताने टाकलेल्या अनेक चांगल्या लोकाभिमुख पावलांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. उदा. अतिशय श्रीमंत व अतिशय गरीब नागरिकांतील आर्थिक दरी कमी करण्यासाठी 'कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर' अशा तर्‍हेचे कायदे घडवून आणून शेतकर्‍यांना व भाडेकरूंना भारत सरकारने दिलासा मिळवून दिला. कारखानदारांच्या पिळवणुकीला तोंड देता यावे म्हणून कितीतरी कामगाराभिमुख कायदे भारत सरकारने केले. या तर्‍हेचे समाजाभिमुख कायदे करून भारताने एक व्यापक मध्यमवर्ग निर्माण केला जो पाकिस्तान निर्माणच करू शकला नाही. आजही त्यांच्या राजकारणवर जमीनदारांची इतकी घट्ट पकड आहे की गोरगरीबांना राजकारणात शिरणे शक्यच नाहीं. त्यामुळे अतिशय गरीबीत हाल-अपेष्टा सहन करणार्‍या जनतेला तालीबानचे आकर्षण वाटले यात नवल ते काय?
भारतात महर्षी कर्वे यांच्यासारख्या समाजपरिवर्तन करणार्‍या दृष्ट्यांनी भारतीय नारीला विमुक्त व सुशिक्षित करून पुढील भारतीय पिढीला अधिक सुशिक्षित व अधिक कार्यक्षम बनविले, तर "भूदान" चळवळीचे प्रणेते असलेल्या विनोबा भावेंच्यासारख्या आधुनिक संतांनी भारतात एक वेगळीच क्रांती घडवून आणली. या दोघांना "भारतरत्न"सारख्या सन्माने गौरविले गेले. असे कुणी पाकिस्तानात पुढे आले नाही. याउलट पकिस्तानमध्ये एका पाठोपाठ एक हुकुमशहाच जन्माला आले.
भारताप्रमाणे पाकिस्तानला आर्थिक उत्कर्ष साधताच आला नाही. उलट भारताविरुद्धच्या (नसलेल्या) वैराचे बुजगावणे उभे करून येनकेनप्रकारेण अमेरिका व युरोपीय देशांकडून त्याने जे पैसे उकळले त्यातले बरेचसे लष्करशहांच्या खिशात गेले व जे थोडेफार उरले ते भारताविरुद्ध वापरले गेले. पाकिस्तानला आर्थिक वैभव निर्माणच करता आले नाही, पण असंख्य दहशतवाद्यांच्या टोळ्या त्यांनी उभ्या केल्या व या दहशतवादी टोळ्यांना भारतात हैदोस घालून आपल्या प्रगतीस खीळ घालण्यास मुक्त परवानगी दिली.
पण पैसे व धर्मांधता या गोष्टीवर उभ्या केलेल्या या "सैन्या"ची कुणावरच निष्ठा नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या सरकारवरच उलटले व दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले बनून या सैन्याने पाकिस्तानातच थैमान घालायला सुरुवात केली आहे.
भारताबरोबर वैर करून पाकिस्तानचा काहीच फायदा झालेला नाहीं, उलट अतोनात नुकसानच झाले आहे. म्हणून भारताने केलेल्या अनेक सुधारणांचे अनुकरण करून, श्रीमंत-गरीबातली दरी कमी करून, एका सुखवस्तू मध्यमवर्गाची निर्मिती करून आणि फुकटात मिळणारी मदत नाकारून स्वत:च्या पायावर उभे रहायची तयारी दर्शविली तर त्या राष्ट्राचे अजूनही कल्याण होईल.
-सुधीर काळे, जकार्ता

No comments:

Post a Comment