Monday 31 August 2009

पाकिस्तानचा खरा शत्रू कोण?

पाकिस्तानचा खरा शत्रू कोण?

पाकिस्तानला खरा धोका कोणाकडून आहे...?
"अल जझीरा" या अरबी भाषिक चित्रवाहिनीने "पाकिस्तानी गॅलप" या संस्थेकडून जनमताची पाहणी करविली. २६०० पेक्षा जास्त लोकांनी या जनमतकौलात भाग घेतला. प्रश्नोत्तरे मतदात्यांमध्ये आणि प्रश्न विचारणार्‍यांमध्ये समोरासमोर झाली, अनेक प्रश्न विचारण्यात आले. पण मुख्य प्रश्न होता कीं पाकिस्तानला सर्वात मोठा धोका कुणाकडून आहे? तालीबानकडून? की भारताकडून? की अमेरिकेकडून?
५९ टक्के पाकिस्तानी लोकांना सर्वात जास्त धोका अमेरिकेकडून वाटला, त्या खालोखाल (पण खूप खाली) फक्त १८ टक्के लोकांना भारताकडून वाटला तर तालीबानकडून धोका आहे असं मानणारे फक्त ११ टक्के निघाले. १२ टक्के लोकांनी "माहीत नाहीं" असे उत्तर दिले.
भारतीय अचंब्यातच पडतील कीं आपला पूर्वीचा "हमखास पहिला नंबर" कसा व का गेला? पाकिस्तानी लोकांना भारताच्या एकंदर वागणुकीच्या सखोल अभ्यासानंतर "भारतीय लोक चांगले आहेत" असा सक्षात्कार झाला कीं काय? कसाबने इथल्या न्यायालयात दिलेल्या कबुलीजबाबानंतर त्यांच्या असं लक्षात तर नाहीं आलं कीं "आपलंच नाणं खोटं" होतं! की लीन, दीन, शांत, सहनशील आणि भित्रा भारत अणुशस्त्रे असूनही फक्त ’अलल-डुर्र’च्या वल्गना करेल पण युद्धात मात्र उतरणार नाहीं अशी त्यांची खात्री आहे? की अमेरिकेने दिलेले करोडो डॉलर हडप करून व तृप्तीची ढेकर देत-देत त्यांच्याविरुद्धच नमकहरामी करायची अशी नीती पाकिस्तानी जनता पाळत आहे? की अमेरिकेचे पैसे फक्त राजकीय नेत्यांच्या किंवा लष्करातल्या उच्चपदस्थ लोकांच्या ’खोल’ खिशात जातात व जनतेला फक्त करवंटी मिळते म्हणून या दोन गटांची मते इतकी भिन्न आहेत?
दुसरे कारण असेही असू शकते कीं अमेरिका या लढाईत त्यांच्यावरच्या धोक्याविरुद्ध मोर्चाबांधणी म्हणून उतरली आहे आणि पैसे टाकून पाकिस्तानी सैन्य व तालीबानी लढवय्ये यांना परस्पर लढवत आहे व आपले रक्त सांडण्याचे टाळते आहे. याचा तर राग नाहीं? शिपुरड्यांचे रक्त सांडते, उच्च लष्करी अधिकारी त्यांच्या मेजावरून हुकूम देतात व पैसे खातात यामुळे तर ही नाराजी नाहीं? याचा खरा अर्थ कळणे पाकिस्तानच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पण अमेरिकेवरचा राग खरा असेल तर ती एक दयनीय गोष्ट ठरेल. कारण पाकिस्तानला आपल्या बाजूला ठेवण्यासाठी अमेरिका करोडो डॉलर्स इथे एका बाजूने ओतते आहे, तर दुसर्‍या बाजूला या बेहिशोबी पैशाला पाय किती व कुठे-कुठे फुटतात याची माहिती कुणालाच नाहीं. मुंबईवरील हल्ल्यातील एकुलता एक जिवंत आरोपी कसाब याने सांगितल्याप्रमाणे हा पैसा अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठीही वापरला जातोय. त्यांच्या हातात बंदुका तर दिल्या जातात, पण त्यानंतर ते त्या कुणावर रोखतील याचा नेम नाहीं. हे तर भाडोत्री सैनिक! जी बंदूक निष्पाप मुंबईकरांवर रोखली तीच बंदूक ते बेनझीरवरही रोखतात. जो जास्त पैसा देईल त्याचा हुकूम चालतो. मग अमेरिकेच्या पैशाने अतिरेक्यांविरुद्ध लढाई राहिली बाजूला, उलट आजवर त्यांचे पोषणच होत आले आहे. आता तर झरदारीच स्वत: कबूल करत आहेत की आय्.एस्.आय्.च्या सहाय्याने पाकिस्तानने एके काळी हा "भस्मासुर" निर्मिला तो आता त्यांनाच भस्मसात् करायला निघाला आहे. (पहा "डॉन" या कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या दैनिकातील ही लिंक: http://tinyurl.com/kr2e5p किंवा http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/pakistan/provinces/16-jihad-and-the-state-hs-06) जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना या त्यांच्या धोरणात मूलभूत आणि व्युहात्मक बदल करायचे असतील तर त्यांनी सर्वात आधी हे फुकटचे पैसेवाटप थांबविले पाहिजे. पाकिस्तानला स्वत:च्या गरजा स्वत: कमावलेल्या पैशाने मिटवायला भाग पाडले पाहिजे व शिकविले पाहिजे. कर्ज द्या, पण ते पाकिस्तानने फेडलेच पाहिजे ही अट असू द्या. पाकिस्तानमध्ये लोकशाही असो, लष्करशाही असो किंवा तालीबानी सत्ता असो, ती पाकिस्तानी लोकांची आवड आहे. त्यात आपण (भारतीयांनी किंवा अमेरिकेने) नाक खुपसू नये. आपल्याला पसंत पडो वा न पडो, तो पाकिस्तानी जनतेचा हक्क आहे व त्यांना आपले घर सांभाळू दे. जोवर पाकिस्तानची फुकट "खाटल्या"वर बसून खायची संवय जात नाहीं तोवर ते राष्ट्र सुधारणार नाहीं.
की पाकिस्तानी जनतेला खरा धोका तिच्या जनतेकडूनच आहे?
बिचारी पाकिस्तानी जनता! तिला फारसे पर्यायच उपलब्ध नाहीत. म्हणून मला तर त्यांची दयाच येते!
अधिक माहिती-
५९ टक्के पाकिस्तानी लोकांना सर्वात जास्त धोका अमेरिकेकडून वाटला, त्या खालोखाल (पण खूप खाली) फक्त १८ टक्के लोकांना भारताकडून सर्वात जास्त धोका आहे असं वाटलं तर तालीबानकडून धोका आहे असं मानणारे फक्त ११टक्के निघाले. १२ टक्के लोकांनी "माहीत नाहीं" असे उत्तर दिले.
इतर प्रश्नोत्तरांत कांहीं रोचक प्रश्न असे:
१. सगळ्यात जास्त लायक नेता कोण? (जरदारी फक्त ११ टक्के, नवाज़ शरीफ ३८ टक्के घेऊन पहिला.)
२. पीपीपी पक्षाबद्दल काय मत? (२० टक्के पाठिंबा, ३८ टक्के विरुद्ध, ३० टक्के निर्विकार)
३. जरदारी योग्य नेता आहेत? (नकार! फक्त ११ टक्के पाठिंबा, ४२ टक्के विरुद्ध, ३४ टक्के निर्विकार)
४. तालीबानबरोबर चर्चा करावी कीं युद्ध? (साधारणपणे दोन्ही बाजूंनी ४०-४२ टक्के मते पडली)
५. "द्रोणाचार्यां"च्या मार्‍याला विरोध कीं पाठिंबा? (Pilotless, remote-controlled drone attacks) (फक्त ९ टक्के लोकांचा पाठिंबा, ६७ टक्के लोकांचा विरोध)
- सुधीर काळे, जकार्ता

No comments:

Post a Comment