Monday 31 August 2009

याला जबाबदार कोण?

या विध्वंसाला नेमके जबाबदार कोण?

पाच महिन्यांच्या युद्धबंदीनंतर गाझा पट्टीत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला. तब्बल तीन आठवडे सुरु असलेले हे युद्ध सुरु होण्यामागचे नेमके कारण काय?

सर्व जगाने वृत्तपत्रांमधून आणि दूरचित्रवाहिन्यांमधून गाझा पट्टीतील नागरिकांच्या हाल-अपेष्टांची दृष्ये पाहिली. हा संहार पाहिल्यानंतर या परिस्थितीला कोण जवाबदार आहे, असा प्रश्‍न नक्कीच पडू शकतो. कारण इस्त्राईल म्हणते की, 'हमास'ने इस्त्राईलवर रॉकेट हल्ला करुन सर्वांत प्रथम कुरापत काढली. पण हमासने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मग नेमके सत्य काय आहे?

आज उपग्रहाद्वारे आपण जगात काय चालले आहे, याचा 'आँखो-देखा हाल' थोडक्‍यात 'लाइव्ह' दृष्ये पाहू शकतो. शिवाय संगणकाद्वारे फोटो अधिक सुधारित करण्याच्या सोयीमुळे ते फोटो नीटही पाहू शकतो. असे असताना या प्रश्‍नात नक्की कुणी कुणाची कुरापत काढली, याचा निर्विवाद पुरावा आज ही पुढारलेली राष्ट्रे देऊ शकतात.

असे जर संयुक्त राष्ट्रसंघातर्फे करण्यात आले, तर हे युद्ध कोणी कोणावर लादले, हे सहज सिद्ध करता येईल व त्यानुसार या युद्धातला नायक कोण आणि खलनायक कोण हेही पक्के ठरवता येईल.

खरा गुन्हेगार कोण आहे, हे कळल्यानंतर जगभर जी काही निदर्शने होत आहेत, त्यालाही योग्य दिशा मिळेल. हे होणे अतिशय जरुरीचे आहे. याबाबतीत संयुक्त राष्ट्राचे प्रमुख बान की मून यांनी असे पुरावे सादर करण्याकडे लक्ष पुरवावे व जागतिक शांतीला निर्माण होणाऱ्या धोक्‍याचे वेळीच निवारण करावे.

सुधीर काळे, जकार्ता, इंडोनेशिया

No comments:

Post a Comment