श्रीलंकेच्या खेळाडूंवर हल्ला करुन पाकिस्तानने जणूं स्वतःच्याच थोबाडीत मारुन घेतली आहे. कसला हा देश! पण कधी श्रमाची कमाई केलीच नाही तर काय करणार? कायम काही ना काही कारण पुढे करुन अमेरिकेची अब्जावधी डॉलर्सची मदत घ्यायची, दहशतवादाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा सच्चा मित्र म्हणून मिरवायचे आणि दुसऱया बाजूने दहशतवादाला खतपाणी घालायचे असे दुटप्पी धोरण पाकिस्तानने नेहमीच अवलंबिले आहे. याबाबत पाकिस्तान नेहमीच नाण्याच्या दोन्हा बाजूंनी खेळत आलं आहे. अलीकडेच स्वात खेऱयात शरियत लागू करुन त्यांनी हेच दर्शविलं आहे.
पाकिस्तानात रचला गेलेला आणि पाकिस्तानातूनच संचलित केल्या गेल्या मुंबईवरील हल्ल्यानंतर आपल्या सरकारने व क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याचा अतिशय उचित निर्णय घेतला आणि त्यामुळे रिकाम्या झालेल्या वेळेत श्रीलंकेने तो दौरा करण्याचा मूर्खपणाचा निर्णय घेतला व स्वतःच्या खेळाडूंना धोक्यात ढकलले. सुदैवाने त्यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. तरीही या हल्ल्याने पाकिस्तानची प्रतिमा डागाळलीच!
आधीच आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला व त्यांच्या सरकारला ही घटना आणखी अडचणीत टाकणारी ठरली आहे. त्या देशाची थोडीफार लाज होती, तीही धुवून निघाली. अलीकडे मला असे वाटते की पाकिस्तानी सैन्य व पाकिस्तानच्या इतर सुरक्षा संघटना आता त्यांच्या देशाशी व त्यांच्या सरकारशी एकनिष्ठ राहिलेल्याच नाहीत. त्यांची निष्ठा धर्म आणि राष्ट्र यांच्यात विचित्र दुभागली गेली आहे व कोणाच्या आज्ञा पाळायच्या याबाबत त्यांची फौज काहीशी संभ्रमात पडली आहे व दहशतवाद्यांना घाबरु लागली आहे. हा केवळ पाकिस्तानला नव्हे तर शेजारी राष्ट्र म्हणून आपल्यालाही धोका आहे.
एक गोष्ट मात्र भारताच्या दृष्टिने चांगली झाली, ती म्हणजे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण यानिमित्ताने जगासमोर आले. कधी कधी वाईटातून चांगले निघते, ते असे.
सुधीर काळे, जकार्ता, इंडोनेशिया
Monday 31 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment